आपत्तीला तोंड देण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा
By Admin | Updated: May 28, 2014 00:07 IST2014-05-28T00:07:37+5:302014-05-28T00:07:37+5:30
पावसाळ्यामध्ये आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर त्याला तोंड देण्याकरिता महानगरपालिकेने आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित केली आहे

आपत्तीला तोंड देण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा
वसई : पावसाळ्यामध्ये आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर त्याला तोंड देण्याकरिता महानगरपालिकेने आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित केली आहे. महानगरपालिकेच्या आचोळे येथील अग्निशमन केंद्रामध्ये ही यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. गेल्यावेळी १७ दिवस समुद्रात प्रचंड लाटा उसळतील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने प्रभावी यंत्रणा उभारली होती. यंदाही अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून ही यंत्रणा उभी करण्यात आली आहे. २००५ साली ठाणे जिल्हा पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पाऊस होवून अनेक भागात महापूर आला होता. त्यावेळी आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित नसल्यामुळे सारा उपप्रदेश किमान ४ दिवस पाण्याखाली गेला होता. त्यानंतर मात्र महसूल व तत्कालीन नगरपरिषदांनी संयुक्तरित्या आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित केली. सध्या महानगरपालिकेने प्रत्येक प्रभाग समितीच्या कार्यालयात नियंत्रण कक्ष उभारली आहेत. लवकरच महावितरण, पोलीस, महसूल, पंचायत समिती, महानगरपालिका व स्थानिक ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांची संयुक्त सभा घेण्यात येणार आहे. या सभेमध्ये सदर यंत्रणा प्रभावीरित्या कशी राबवण्यात यावी यावर विचारविनियम करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)