समाज माध्यमांचा प्रभावी वापर काळाची गरज

By Admin | Updated: July 16, 2016 02:12 IST2016-07-16T02:12:32+5:302016-07-16T02:12:32+5:30

माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच सोशल मीडियाचा वापर करणे अपरिहार्य झाले आहे.

Effective use of social media is the need of the hour | समाज माध्यमांचा प्रभावी वापर काळाची गरज

समाज माध्यमांचा प्रभावी वापर काळाची गरज

मुंबई : माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच सोशल मीडियाचा वापर करणे अपरिहार्य झाले आहे. तथापि, या माध्यमाची गती पाहता त्याचा वापर काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे, असे मत विविध सोशल मीडिया आणि संवादतज्ज्ञांनी व्यक्त केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने ‘तंत्र सोशल मीडियाचे’ या विषयावर मंत्रालयात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणात सायबर कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. प्रशांत माळी, सोशल मीडियातज्ज्ञ विनायक पाचलग, मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार रवीकिरण देशमुख, विशेष कार्य अधिकारी निधी कामदार, मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी हेमराज बागूल, कीर्ती पांडे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी महासंचालक ब्रिजेश सिंह, संचालक (प्रशासन) देवेंद्र भुजबळ, संचालक (वृत्त जनसंपर्क) शिवाजी मानकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

सोशल मीडियाचा वापर करताना साद-प्रतिसाद, परस्पर संवाद होणेही आवश्यक आहे. माहिती अधिकाऱ्यांनी विधायक माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक या जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांसह सर्व शासकीय यंत्रणेशी समन्वय ठेवणे आवश्यक आहे, असे महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी सांगितले. या वेळी पाचलग यांनी शासकीय कार्यालयात फेसबुक, टिष्ट्वटर हँडल यु-ट्युब चॅनेलचा वापर तसेच ब्लॉगची लेखनशैली कशी असावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. पाचलग यांनी सोशल मीडियाच्या शासकीय कामातील प्रभावीपणे वापर करण्यासंदर्भात माहिती दिली. अ‍ॅड.प्रशांत माळी यांनी सोशल मीडिया आणि सायबर सिक्युरिटी या विषयावर मार्गदर्शन केले.

सोशल मीडियाचा वापर करताना घ्यावयाची काळजी आणि चुका होऊ नये यासाठीची सतर्कता याबाबत विविध उदाहरणांसह माहिती दिली. मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार रविकिरण देशमुख म्हणाले, माध्यमात होणारे बदल स्वीकारणे आवश्यक आहे. सोशल मीडियाचा वापर प्रभावीपणे करावा. विशेष कार्य अधिकारी निधी कामदार यांनीही कमी वेळेत माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडिया गरजेचा असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी हेमराज बागूल म्हणाले, स्मार्ट फोनचा गुणात्मक वापर करणे आवश्यक आहे.

Web Title: Effective use of social media is the need of the hour