Join us  

शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी 'शिक्षणाची वारी',  १७ नोव्हेंबरला होणार लातूरमध्ये उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 6:47 PM

शाळेतील प्रत्येक मूल शिकावे यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम सुरू आहे. अध्ययन-अध्यापन पद्धतीत शिक्षक नवनवीन प्रयोग करत आहेत. हे प्रयोग समजून-उमजून, अनुकरन करून शाळा प्रगत करण्यासाठी प्रयत्न करावेत, या उद्देशाने शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या एका आगळ्यावेगळ्या अनोख्या शिक्षणाच्या वारीचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले.

ठळक मुद्देप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम सुरू अध्ययन-अध्यापन पद्धतीत शिक्षक नवनवीन प्रयोग१७ नोव्हेंबरला होणार लातूरमध्ये उद्घाटन

मुंबई : शाळेतील प्रत्येक मूल शिकावे यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम सुरू आहे. अध्ययन-अध्यापन पद्धतीत शिक्षक नवनवीन प्रयोग करत आहेत. हे प्रयोग समजून-उमजून, अनुकरन करून शाळा प्रगत करण्यासाठी प्रयत्न करावेत, या उद्देशाने शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या एका आगळ्यावेगळ्या अनोख्या शिक्षणाच्या वारीचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. शिक्षणाच्या वारी हा अभिनव कार्यक्रम दि. १७ ते १९ नोव्हेंबर २०१७ दरम्यान लातूर येथे आयोजित केला आहे. वारीचे उद्घाटन कौशल्य विकास मंत्री तथा पालकमंत्री श्री. संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत नियोजित शिक्षक व शाळा व्यवस्थापन सदस्य वारी पाहू शकतील. दुपारी ३ ते सायंकाळी ५.३० या दरम्यान शिक्षणप्रेमी वारीतील प्रयोगांचा आनंद घेवू शकतील. या वारीत गणित व भाषा वाचन विकास, तंत्रज्ञानाचा अध्यापनात प्रभावी वापर, पाठ्यपुस्तकाची बदलती भूमिका, मूल्यवर्धन, कला व कार्यानुभव, क्रीडा, स्वच्छता व आरोग्य, किशोरवयीन आरोग्य शिक्षण, दिव्यांग मुलांसाठीचे शिक्षण, कृतियुक्त विज्ञान व वैज्ञानिक दृष्टीकोन, अभिजात भाषा तसेच शालेय पटसंख्येत भरीव वाढ होण्यासाठी राबविण्यात आलेले उपक्रम पाहता येणार आहेत. या शैक्षणिक प्रयोगांचा सर्वांना अनुभव व अनुभूती घेता यावी यासाठी लातूर, अमरावती, रत्नागिरी आणि नाशिक या चार ठिकाणी शिक्षणाच्या वारी आयोजित केली आहे.ग्रामीण तसेच शहरी भागातील मुलांना उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांचे सक्षमीकरण ही काळाची गरज आहे. याच उद्देशाने प्रत्येक जिल्ह्यातून ज्यांना शाळा प्रगत करण्यात अडचणी येत आहेत; अशा शाळांतील शिक्षकांना १०० टक्के मुले शिकू शकतात, हा विश्वास या वारीमधील स्टॉलच्या माध्यमातून देण्यासाठी सहभागी होण्याची संधी दिली आहे. याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीतील सदस्यांनाही शाळा प्रगत होण्यामध्ये त्यांचा उत्स्फूर्त सहभागा मिळावा यासाठी त्यांनाही वारीत सहभागी करून घेण्यात आले आहे. शिक्षणाची वारी या अभिनव संकल्पनेस भारत सरकारने सर्व शिक्षा अभियान कार्यक्रमांतर्गत विशेष मंजूरी दिली आहे. शिक्षणाची वारीमध्ये विविध शैक्षणिक संकल्पनांवर आधारित एकूण ५०  शैक्षणिक स्टॉल्स आहेत. यात अध्यापनाच्या विविध प्रक्रिया, साधने, प्रात्याक्षिके याचे सादरीकरण करण्यात येत आहे.  

टॅग्स :शैक्षणिक