मुंबईतील सागरी किनाऱ्यांना प्रदूषणाचे ‘ग्रहण’

By Admin | Updated: September 27, 2016 03:06 IST2016-09-27T03:06:23+5:302016-09-27T03:06:23+5:30

मुंबई शहर आणि उपनगरातील पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीला प्रदूषणाचे ‘ग्रहण’ लागले आहे. कोणतीही प्रक्रिया न करता, समुद्रात सोडण्यात येणारे सांडपाणी, किनारपट्टीवर

'Eclipse' of pollution in coastal coast of Mumbai | मुंबईतील सागरी किनाऱ्यांना प्रदूषणाचे ‘ग्रहण’

मुंबईतील सागरी किनाऱ्यांना प्रदूषणाचे ‘ग्रहण’

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीला प्रदूषणाचे ‘ग्रहण’ लागले आहे. कोणतीही प्रक्रिया न करता, समुद्रात सोडण्यात येणारे सांडपाणी, किनारपट्टीवर आढळणारा प्लॅस्टिकचा खच, तिवरांची होणारी बेसुमार कत्तल, असे अनेक घटक सागरी किनाऱ्याच्या प्रदूषणाला कारणीभूत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, तिवरांची कत्तल हा घटक प्रामुख्याने प्रदूषणात भर घालत असून, या सर्वच गोष्टींकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. परिणामी, मुंबईच्या सागरी किनाऱ्याला लागलेले प्रदूषणाचे ‘ग्रहण’ सुटणार कधी? असा सवाल ‘वॉचडॉग फाउंडेशन’ने केला आहे.
वर्सोवा येथील बंगल्यासाठी विनोदवीर कपिल शर्मा याने तिवरांची कत्तल केल्याचा आरोप झाल्यानंतर, पर्यावरणवाद्यांनी यावर जोरदार आवाज उठविला. यातच वर्सोवा खाडीलगतच्या तिवरांची बेसुमार कत्तल झाल्याचे ‘वॉचडॉग फाउंडेशन’ने महापालिकेसह जिल्हाधिकारी आणि वनविभागाच्या लक्षात आणून दिले. केवळ वर्सोवा खाडीच्या प्रदूषणावर न थांबता, संस्थेचे संचालक गॉडफ्रे पिमेंटा यांनी मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईमधील खाडी आणि किनाऱ्यांचा आढावा घेतला. त्यानुसार, वर्सोवा, गिरगाव चौपाटी, गेट वे आॅफ इंडिया, माहीम खाडी, वाशी खाडी, एलिफंटा बेटे, वरळी सी-फेस, नरिमन पॉइंट, हाजीअली आणि मुंब्रा रेतीबंदर येथील किनारे सर्वाधिक प्रदूषित झाल्याचे पिमेंटा यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांकडून मिळालेल्या जलगुणवत्तेचा आधार घेत, पिमेंटा यांनी प्रदूषणाचा मुद्दा मांडला आहे आणि या संदर्भानुसार, वर्सोवा, गिरगाव चौपाटी, गेट वे आॅफ इंडिया, माहीम खाडी, वाशी खाडी, एलिफंटा बेटे, वरळी सी-फेस, नरिमन पॉइंट, हाजीअली आणि मुंब्रा रेतीबंदर या सागरी किनाऱ्यावरील पाण्यात आॅक्सिजनचे प्रमाण कमी असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे वर्सोवा येथील तिवरांच्या बेसमुसार कत्तलींकडे पिमेंटा यांनी प्रामुख्याने लक्ष वेधले असून, माहीम, शिवडी, वाशी, नवी मुंबई आणि ठाण्यात खाडीतील तिवरांच्या ऱ्हासाला यंत्रणा कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे.

सागरी किनाऱ्याला प्रदूषणाचे ‘ग्रहण’ कसे लागले आहे? याची उदाहरणे देताना पर्यावरणवाद्यांनी ‘सॅटलाइट इमेज’चा आधार घेतला आहे. २०११ साली उपग्रहाद्वारे काढण्यात आलेली छायाचित्रे आणि २०१५ साली काढण्यात आलेल्या छायाचित्रांच्या माध्यमातून सागरी किनारे प्रदूषित झाल्याचे पर्यावरणवाद्यांनी नमूद केले आहे.

- तिवरे तोडण्यास परवानगी नसतानाही, मुंबईतल्या सागरी किनाऱ्यांसह खाडीलगतच्या तिवरांची मोठ्या प्रमाणावर कत्तल होत आहे.
- वर्सोवा येथे तिवरांची मोठ्या प्रमाणावर कत्तल करण्यात आली आहे.
- भांडुप येथे तिवरांच्या पट्ट्यात मोठया प्रमाणावर प्रदूषण झाले असून, येथील जैवविविधता धोक्यात आली आहे.
- शिवडी येथील तिवरांना सांडपाण्याचा फटका बसत असून, रसायनमिश्रित सांडपाण्यामुळे येथील तिवरांवर तेलाचा तवंग चढल्याचे ‘हयुमिनिटी फाउंडेशन’ने या पूर्वीच नमूद केले आहे.
- चेंबूर येथील तिवरांची कत्तल करून, येथे अनधिकृत बांधकाम उभारण्यात आल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर, महापालिकेने यावर कारवाई केली आणि हे अनधिकृत बांधकाम जमिनदोस्त केले. मात्र, महापालिकेने अशा प्रकरणात स्वत:हून पुढे होत कारवाई केल्याची उदाहरणे कमी असल्याचे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे.
- माहीम खाडी आणि महाराष्ट्र निसर्ग उद्यानालगत असलेल्या तिवरांच्या जंगलात मोठ्या प्रमाणावर जैवविविधता आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून येथील जलप्रदूषणात वाढ झाल्याने, येथील निसर्ग संपदा धोक्यात आली आहे.
- एकंदर मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर दिवसेंदिवस प्रदूषण वाढत असून, ते संबंधित प्रशासनाने काहीच कार्यवाही नाही.

किनारेबीओडी लेव्हल
(बायो केमिकल आॅक्सिजन डिमांड,
जैव रासायनिक प्राणवायू मागणी)
किमानकमाल
वर्सोवा१०१२
गिरगाव९.५१२
गेट वे८.८११
वाशी६.५२०
एलिफंटा९१३
वरळी सी-फेस८१४
नरिमन पॉइंट८११.५
हाजीअली९११
मलबार हिल०११
मुंब्रा रेतीबंदर१२१२
(स्त्रोत : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
आणि वॉचडॉग फाउंडेशन)

Web Title: 'Eclipse' of pollution in coastal coast of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.