Join us  

#EarthHour आज तासभरासाठी बत्ती गुल होणार...जगभरातील ‘अर्थ अवर’मध्ये मुंबईही सहभागी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2018 6:38 PM

मध्य रेल्वेनेही आपल्या मुंबईतील मुख्यालयाचे आवश्यक नसणारे दिवे मालवण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देअर्थ अवरची आवश्यकता काय?‘अर्थ अवर’विषयी महत्वाचे मुद्दे‘अर्थ अवर’वरच प्रदूषण वाढवल्याची टीका

वातावरणातील बदलांविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी जगभर ‘अर्थ अवर‘ आयोजित केला जात असतो.. पृथ्वीच्या संरक्षणाविषयी लोकांमध्ये संवेदनशीलता वाढवण्याच्या उद्देशाने सुरु झालेल्या ‘अर्थ अवर’मध्ये आता भारतीयही सहभागी होतात. मुंबईसह अन्य शहरांमध्येही बत्ती गूल केली जाते. Give Up to Give Back म्हणजेच 'परत देण्यासाठी त्याग करा' या घोषवाक्याला जागत मध्य रेल्वेनेही आपल्या मुंबईतील मुख्यालयाचे आवश्यक नसणारे दिवे मालवण्याचा निर्णय घेतला आहे.

अर्थ अवरची सुरुवात वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचरने केली. जगात पहिल्यांदा २००७मध्ये ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरात अर्थ अवर साजरा झाला. नागरिकांना आवाहन करून तासभरासाठी दिवे बंद केले गेले. हळूहळू जागरणाची ही लाट जगभर पसरली. जगभर पृथ्वीच्या पर्यावरण रक्षणाविषयी जागरुकता आणण्यासाठी तासभर बत्ती बंद करण्याची सुरुवात झाली. गेल्या काही वर्षांपासून मुंबईतही अर्थ अवरसाठी अंधार केला जाऊ लागला आहे. मरिन ड्राइव्हवरील इमारतींचे दिवे तसेच गेट वे ऑफ इंडियावरील दिवे बंद केले जाऊ लागले.

 मुंबईतही आज बत्ती गुल

आता रेल्वेनेही या मोहिमेत भाग घेण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी जगभरातील दिवे रात्री साडेआठला मालवले जातील त्याचवेळी मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या इमारतीतील, बाहेरील बत्ती गूल केली जाईल. अर्थात हे दिवे विझवताना अत्यावश्यक कामांसाठी असलेले दिवे मात्र चालूच ठेवले जातील.

अर्थ अवरची आवश्यकता काय?

आपली पृथ्वी राहिली तरच आपण राहणार. पृथ्वीचे अस्तित्व तिच्या पर्यावरणावर अवलंबून आहे. त्यामुळेच पर्यावरण रक्षणासाठी जनजागृतीच्या उद्देशाने सुरू झालेल्या मोहिमेत सहभागी झाले पाहिजे. एक तास दिवे मालवल्याने आपलं काही नुकसान होत नसते. वीज वाचवल्याने पर्यावरण रक्षणाला हातभारच लागतो.

‘अर्थ अवर’विषयी महत्वाचे मुद्दे

‘अर्थ अवर’ वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचरची एक मोहीम आहे जिचा उद्देश ऊर्जा बचत करून पर्यावरण रक्षणासाठी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे हा आहे.

‘अर्थ अवर’ राबवणाऱ्या वर्ल्ड वाइड फंडाचे मुख्यालय सिंगापुरात आहे. २००७मध्ये ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये एका तासासाठी दिवे मालवले गेले तेव्हापासून या मोहिमेची सुरुवात झाली.

दरवर्षी ठरलेल्या दिवशी संध्याकाळी साडे आठ ते रात्री साडे नऊपर्यंत दिवे मालवून अर्थ अवर साजरा केला जातो.

या वर्षी जगभरातील किमान १७८ देश बत्तीबंद करून या मोहिमेत सहभाग घेतील, अशी शक्यता आहे. 

‘अर्थ अवर’वरच प्रदूषण वाढवल्याची टीका

अर्थात या मोहिमेवर टीका करणाराही एक मोठा वर्ग आहे. त्यांच्या मते दिवे बंद केल्याने कोट्यवधी लोक तासभर मेणबत्ती वापरतात. त्यामुळे जे प्रदूषण होईल त्याने पर्यावरणाचे अधिक नुकसान होईल. त्यांच्या मते एक तास दिवे मालवून प्रदूषण वाढवण्यापेक्षा जीवाष्म इंधनावर (खनिज तेल, कोळसा) आपण अवलंबून राहणे थांबवणे आवश्यक आहे. 

टॅग्स :पृथ्वीमुंबई