अधिवेशन काळात प्रधान सचिवांना मुंबईबाहेर जाण्यास मनाई
By Admin | Updated: June 2, 2014 04:31 IST2014-06-02T04:31:41+5:302014-06-02T04:31:41+5:30
राज्याचे मुख्य सचिव जे़ एस़ सहारीया यांनी सर्व मंत्रालयीन विभागांच्या अपर मुख्य सचिव, प्रधान सचिवांसह सचिवांना अधिवेशन काळात सभागृहात उपस्थित राहण्याचे बंधन घालून मुंबई बाहेर जाण्यास मनाई केली आहे़
अधिवेशन काळात प्रधान सचिवांना मुंबईबाहेर जाण्यास मनाई
नारायण जाधव, ठाणे - राज्य विधी मंडळाचे पावसाळी अधिवेशन २ जून पासून मुंबईत सुरू असून या अधिवेशन काळात विधानमंडळाच्या उभय सभागृहांच्या कामकाजात कोणत्याही बाबींच्या अनुषंगाने कोणत्याही विभागाचा मुद्दा चर्चेस उपस्थित होऊ शकतो, यामुळे त्यावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव जे़ एस़ सहारीया यांनी सर्व मंत्रालयीन विभागांच्या अपर मुख्य सचिव, प्रधान सचिवांसह सचिवांना अधिवेशन काळात सभागृहात उपस्थित राहण्याचे बंधन घालून मुंबई बाहेर जाण्यास मनाई केली आहे़ याबाबत तातडीने आदेश काढून सहारिया यानी सर्व संबधित सचिवांना सूचित केले आहे़ विधान मंडळाच्या सभागृहात तारांकीत व अतारांकीत प्रश्न, लक्षवेधी, औचित्य, नियम ९३ अन्वये स्थगन प्रस्ताव, विशेष उल्लेख या संसदीय आयुधाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होऊ शकते़ त्यावर शासनाकडून तत्काळ विहीत कालावधीत कार्यवाही अपेक्षित असते़मात्र, बर्याच वेळा ती होत नसल्याने सदस्यांकडून नापंसती व्यक्त होऊन प्रसंगी संबधित मंत्री अडचणीत येऊ शकतात, यामुळे पिठासिन अधिकार्यांना वारंवार बैठक घेऊन शासनाला निर्देश द्यावे लागतात, हे प्रकार टाळण्यासाठी मुख्य सचिवांनी हा फतवा काढला आहे़ सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना सर्वसमावेशक उत्तरे देता यावीत, ती परिपूर्ण असावीत, याची दक्षता घेण्याचेही सहारिया यांनी संबधित सचिवांना बजावले असून त्याचा अहवाल त्यांनाही दर आठवड्याच्या पहिल्या दिवशी द्यावेत,असे बजावले आहे़ या आदेशांचे जे सचिव पालन करणार नाहीत, विहीत कालमर्यादेत त्यांना आखून दिलेली कोणतीही बाब प्रलंबित राहील्यास संबधित विभागाच्या सचिवावर कडक कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशात बजावण्यात आले आहे़ काही अपरिहार्य परिस्थितीत एखाद्या सचिवास अधिवेशन काळात मुंबई बाहेर जाणे आवश्यक असल्यास त्यांनी संबधित विभागाचे मंत्री किंवा आपली परवानगी घेऊनच जावे,असे त्यांनी स्पष्ट केले आहे़