गेटवेच्या सुरक्षेला पालिकेचा खोडा
By Admin | Updated: January 8, 2015 00:51 IST2015-01-08T00:51:30+5:302015-01-08T00:51:30+5:30
अतिरेकी हल्ल्यानंतर असुरक्षित ठरलेल्या मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर सीसीटीव्ही, टेहळणी मनोरे बसविण्याच्या पोलिसांच्या मागणीला गेली सहा वर्षे पालिका केराची टोपली दाखवीत आहे़

गेटवेच्या सुरक्षेला पालिकेचा खोडा
मुंबई : अतिरेकी हल्ल्यानंतर असुरक्षित ठरलेल्या मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर सीसीटीव्ही, टेहळणी मनोरे बसविण्याच्या पोलिसांच्या मागणीला गेली सहा वर्षे पालिका केराची टोपली दाखवीत आहे़ यावर स्थायी समितीमध्ये तीव्र पडसाद उमटताच गेटवे आॅफ इंडिया हा परिसर
पुरातन असल्याने पुरातन वास्तू समितीने यावर हरकत घेतली असल्याचा बचाव पालिका प्रशासनाने केला आहे़
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर ओढावलेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर गेटवे परिसरात ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला़ यासाठी पोलीस आयुक्तांनी पालिकेकडे परवानगी मागितली आहे़ मात्र आतापर्यंत आठ पत्रे पाठवूनही पालिकेने यावर कोणतीच भूमिका घेतलेली नाही, अशी नाराजी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे स्थायी समितीमध्ये आज व्यक्त केली़
मात्र गेटवे परिसर हा पुरातन असल्याने त्या ठिकाणी टेहळणी मनोरे बसविल्यास पुरातन वास्तूच्या सौंदर्यात बाधा येईल, अशी हरकत पुरातन वास्तू समितीने घेतली आहे़ त्यामुळे तात्पुरते सीसीटीव्ही कॅमेरे अथवा टेहळणी मनोरे बसविण्याची परवानगी देता येईल, असे अतिरिक्त आयुक्त एस़व्ही़आऱश्रीनिवास यांनी स्पष्ट केले़ (प्रतिनिधी)
असा होता पोलिसांचा प्रस्ताव
२६/११ च्या हल्ल्यानंतर समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षा वाढविण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, मेटल डिटेक्टर, आठ फूट उंच कायमस्वरूपी बॅरिकेड्स, बॅगेज स्कॅनर्स आणि टेहळणी मनोरे बसविण्याचा प्रस्ताव पोलिसांनी पालिकेपुढे ठेवला होता़ शहरात प्रवेश करणारा पर्यटक मेटल डिटेक्टरमधून बाहेर पडल्यास एकप्रकारे त्याची तपासणीच होणार होती़
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबईत दोन ते तीन हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रकल्प आहे़ आजच्या घडीला मुंबईत अडीचशे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत़ यापैकी काही गेटवे परिसरातच असून पालिकेमार्फत त्यांची देखभाल होत आहे, असे प्रशासनाने सांगितले़
या प्रस्तावात अटकाव कोणाचा?
पोलिसांनी गेटवे आॅफ इंडिया परिसरात कायमस्वरूपी सीसीटीव्ही व मनोरे बसविण्याचा प्रस्ताव ठेवला आहे़ मात्र या पुरातन परिसराच्या सौंदर्यात बाधा येण्याची शक्यता असल्याने पुरातन वास्तू समितीने यास अटकाव केला आहे़