कोंडी व अपघातांचे सर्कल
By Admin | Updated: November 8, 2014 01:00 IST2014-11-08T01:00:18+5:302014-11-08T01:00:18+5:30
कळंबोली जंक्शन परिसरात वाहतूक कोंडीबरोबरच अपघाताचे प्रमाणही वाढत चालले आहे. गेल्या काही महिन्यात या परिसरात एकूण ३० अपघाताची नोंद झाली आहे

कोंडी व अपघातांचे सर्कल
कामोठे : कळंबोली जंक्शन परिसरात वाहतूक कोंडीबरोबरच अपघाताचे प्रमाणही वाढत चालले आहे. गेल्या काही महिन्यात या परिसरात एकूण ३० अपघाताची नोंद झाली आहे. त्यामध्ये एकूण ३२ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या वर्षापेक्षा ही आकडेवारी मोठी आहे. जखमींचे प्रमाणही अधिक अपघात रोखण्याच्यादृष्टीने वाहतूक नियोजनासंदर्भात वाहतूक शाखेकडून प्रभावी उपाययोजान केली जात नसल्याने नागरिकांमध्ये आणि वाहनचालकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पनवेल-सायन महामार्ग, मुंबई-पुणे आणि द्रुतगती महामार्ग, एनएच ४ यासारखे महामार्गांसाठी कळंबोली महत्वाचे आहे. याशिवाय नवी मुंबई, मुंबई, उपनगर आणि ठाणे परिसरात नोकरी व्यवसायाकरिता मोठ्या प्रमाणात चाकरमानी खाजगी वाहनांचा वापर करतात. ज्यामुळे सर्कलला मोठ्या प्रमाणात रहदारी असतेच. सकाळ आणि संध्याकाळी वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवासी आणि वाहनांना या परिसरात तास्न तास अडकून पडावे लागते. येथे सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली असून सर्कलमधून रस्ताही काढण्यात आला आहे.
दरम्यान ही यंत्रणा कुचकामी असून त्यामुळे जास्त कोंडी होते. एक ते दोन मिनिटांचा ग्रीन सिग्नल मिळत असल्याने त्यामधून तुलनेने कमी वाहने पास होतात. त्यामुळे वाहनांचा लांबच लांब रांगा लागत आहे. विशेषत: कळंबोलीकडून सर्कलकडे येणाऱ्या मार्गिकेवर थेट स्टील मार्केटपर्यंत रांग लागते. त्याचबरोबर पनवेलकडून येणारी वाहने थेट आसूडगावपर्यंत उभी राहतात. जेएनपीटीकडून येणाऱ्या अवजड वाहनांना तर तास्न तास रांगेत उभे रहावे लागत आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न तर आहेच त्याचबरोबर कळंबोली सर्कलच्या दोनशे ते तीनशे मीटरच्या परिघात मोठ्या प्रमाणात अपघात घडतात. विशेषत: मॅकडोनाल्ड परिसरात अपघात अधिक होत असल्याचे वाहतूक पोलिसांची म्हणणे आहे. रुंदीकरणाचे काम जवळपास पूर्ण होत आले असल्याने आता एकूण ४ ते ५ मार्गिका मिळतात. त्यामुळे चालक वाहने भरधाव वेगाने दामटवतात. दरम्यान प्रवाशांकडूनही महामार्ग ओलांडला जातो. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते.
कळंबोलीतील वाहतूक नियोजनाचा बोजवारा उडाल्याने अपघातांचे प्रमाण दिवसागणीक वाढत आहे. महामार्ग ओलांडण्यासाठी ठराविक अंतरावर पादचारी पूल बांधण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. ज्यामुळे महामार्ग ओलांडताना होणारे अपघात कमी होतील. तसेच सिग्नल यंत्रणाही गर्दीच्यावेळी अधिक प्रभावी करण्याची मागणीही करण्यात येत आहे. त्यामुळे कळंबोलीतील वाहतुकीचे सुयोग्य नियोजन करण्याचे आव्हान वाहतूक शाखेसमोर उभे राहिले आहे. (प्रतिनिधी)