मुंबई : दक्षिण मुंबईत आधीच आवाजाच्या पातळीची मर्यादा ओलांडण्यात आली आहे. त्यात मेट्रोच्या कामामुळे भर पडणार नाही, अशी माहिती मेट्रो रेल कॉर्पोशन लि. (एमएमआरसीएल)ने उच्च न्यायालयाला सोमवारी दिली.मुंबईतील सरासरी आवाजाची पातळी ८० डेसिबल असल्याचे नीरीच्या अहवालात म्हटले असल्याचे, एमएमआरसीएलच्या वकिलांनी न्या. अभय ओक व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाला सांगितले.कफ परेड येथे रात्री १० नंतर मेट्रो-३ चे काम करण्यास उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी स्थगिती दिली. ती मागे घ्यावी, यासाठी एमएमआरसीएलने उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. मुंबईत सरासरी आवाजाची पातळी मर्यादेपेक्षा अधिक आहे. त्यात मेट्रोचे काम भर घालणार नाही, असे एमएमआरसीएलच्या वतीने महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितले.पर्यावरण संरक्षण कायद्यातील व ध्वनिप्रदूषण नियम तरतुदी आम्हाला लागू होत नाहीत, असे एमएमआरसीएलने गेल्या सुनावणीत सांगितले. त्यावर न्यायालयाने स्टेट एन्व्हार्नमेंट इम्पॅक्ट असिसमेंट आॅथोरिटीने एमएमआरसीएला रात्रीच्या वेळेत मेट्रो काम करण्यासाठी परवानगी देताना, ध्वनिप्रदूषणाच्या नियमांच्या अधीन राहून काम केले जाईल, अशी अट घातल्याचे राज्य सरकारच्या लक्षात आणून दिले.सुधारणा करावीध्वनिप्रदूषणाचे नियम, पर्यावरण संरक्षण कायद्यातील तरतुदी आपल्याला लागू होत नाहीत, या एमएमआरसीएलच्या दाव्यानुसार त्यांनी आॅथोरिटीकडून आदेशात सुधारणा करून आणावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले.
मेट्रोच्या कामामुळे मुंबईत ध्वनिप्रदूषण वाढणार नाही, हायकोर्टात दिली माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 01:20 IST