जनजागृतीमुळे बालमजूर घटले
By Admin | Updated: June 12, 2014 01:42 IST2014-06-12T01:42:40+5:302014-06-12T01:42:40+5:30
खेळण्या-बागडण्याच्या वयात परिस्थितीपुढे हतबल झालेली मुले मिळेल ते काम करतात.

जनजागृतीमुळे बालमजूर घटले
स्नेहा पावसकर, ठाणे
खेळण्या-बागडण्याच्या वयात परिस्थितीपुढे हतबल झालेली मुले मिळेल ते काम करतात. अशा मुलांची या जाचातून सुटका करण्यासाठी प्रत्येक पोलीस आयुक्तालय हद्दीत ‘जुवेनाइल अॅड प्रोटेक्शन युनिट’ अर्थात जापू विभाग कार्यरत आहे. या वर्षभरात ठाणे जापू विभागाने आयुक्तालय परिसरात ४ छापे टाकून ४ बालमजुरांची मुक्तता केली आहे. काही वर्षांपूर्वी कारवायांतर्गत सापडणाऱ्या बालमजुरांची संख्या जास्त होती. मात्र, आता कमी झालेली वयोमर्यादा आणि त्याविषयी झालेली जागृती यामुळे जिल्ह्यात बालमजुरांची संख्या अतिशय कमी झाली आहे, असे जापू विभाग आणि कामगार आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.
हॉटेल, टपऱ्यांवर काम करणाऱ्यांमध्ये लहान मुलांची संख्या जास्त असायची. या बालकामगारांची जापू विभागातर्फे वर्षभरात आपापल्या हद्दीत विविध ठिकाणी छापे टाकून सुटका करण्यात येते. ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत या विभागातर्फे २०११ साली ७ छाप्यांमधून २२, २०१२ मध्ये ४ छापे टाकून ८ बालमजुरांची सुटका केली होती. २०१३ मध्ये वर्षभरात ४ छापे टाकून ४ बालमजुरांना सोडवण्यात आले. याप्रकरणी संबंधित ३ मालकांवर कारवाई केली. तसेच बालमजुरांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. (प्रतिनिधी)