नालेसफाईवरून युतीत धुसफूस
By Admin | Updated: May 30, 2015 00:24 IST2015-05-30T00:24:48+5:302015-05-30T00:24:48+5:30
शिवसेनेच्या भ्रमाचा भोपळा मित्रपक्ष भाजपानेच आज फोडला़ नाल्यांच्या सफाईत हातचलाखी करीत ठेकेदार पालिकेचे आर्थिक नुकसान करीत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे़

नालेसफाईवरून युतीत धुसफूस
मुंबई : नालेसफाईच्या कामाला प्रशस्तिपत्रक देऊन मोकळ्या झालेल्या शिवसेनेच्या भ्रमाचा भोपळा मित्रपक्ष भाजपानेच आज फोडला़ नाल्यांच्या सफाईत हातचलाखी करीत ठेकेदार पालिकेचे आर्थिक नुकसान करीत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे़ हा मुद्दा सर्वच राजकीय पक्षांनी उचलून धरल्यामुळे शिवसेना नेत्यांची मात्र पंचाईत झाली आहे़
नालेसफाईच्या पाहणीचे स्वतंत्र दौरे सत्ताधारी करीत आहेत़ नालेसफाई समाधानकारक असल्याचा दावा महापौर स्नेहल आंबेकर एकीकडे करीत असताना ठेकेदारांची हातसफाई उघड करण्याचा विडा भाजपाने उचलला आहे़ भाजपा मुंबई अध्यक्ष अॅड़ आशिष शेलार यांच्या पाहणी दौऱ्याची माहिती भाजपाने स्थायी समितीत आज दिली़ या वेळेस भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी नालेसफाईच्या कामाबाबत हरकतीचा मुद्दा घेत मित्रपक्ष शिवसेनेलाच कोंडीत पकडले़ दोन वर्षांपासून गाळाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ठेकेदारांवर सोपविण्यात आली आहे़ मात्र ठेकेदार गाळ कोणत्या डम्पिंग ग्राउंडवर टाकत आहेत, याबाबत कोणतीच माहिती देण्यात येत नाही़ किती गाळ काढला याची पावती अधिकाऱ्यांकडे नाही, असे कोटक यांनी निदर्शनास आणले़ सत्ताधारी पक्षांमध्ये नालेसफाईवरून पेटलेल्या वादात तेल ओतण्याचे काम विरोधी पक्षाने या वेळी केले़ परंतु नाल्यांची आकडेवारी मांडून सर्व काही आलबेल असल्याचे भासविणाऱ्या शिवसेनेने यावर मौन बाळगण्यातच धन्यता मानली़ (प्रतिनिधी)
च्नियमांनुसार दररोज १६२५ गाड्या नाल्यांमधून गाळ काढून डम्पिंग ग्राउंडपर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे़ मात्र तसे होताना दिसत नाही, अशी नाराजी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी व्यक्त केली़ सत्ताधारी शिवसेना आणि भाजपामध्ये गेल्या काही महिन्यांपासून कुरघोडीचे राजकारण सुरू आहे, असा टोला त्यांनी लगावला़ च्शिवसेनेने समाधान व्यक्त केल्यानंतर त्याच नालेसफाईच्या कामावर भाजपा नाराजी व्यक्त करीत आहे़ वाढीव मालमत्ता करातून ५०० चौ़ फुटांखालील घरांना वगळण्याची उपसूचना सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी मांडली होती़ त्याचे श्रेय भाजपाचे अध्यक्ष अॅड़ शेलार घेत आहेत, असा चिमटा आंबेरकर यांनी काढला़
सफाईची टक्केवारी
विभागटक्केवारी
शहर९२़८२
प.उपनगर ९४़०१
पूर्व उपनगर९१़६०
पावसाळ्यात धोका
नालेसफाईच्या कामामध्ये पारदर्शकता नाही़ नाल्यांमधून गाळ काढला जात आहे का? याबाबतही शाश्वती नाही़ त्यामुळे पावसाळ्यात मुंबईला पुराचा धोका कायम असल्याची भीती विरोधी पक्षांनी व्यक्त केली़
सीसीटीव्ही बसवा
नालेसफाईच्या कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी वॉर्डातील अधिकाऱ्यांची आहे़ मात्र या कामातही कुचराई होत आहे़ त्यामुळे नाल्यांच्या परिसरात सीसीटीव्ही बसवून वॉच ठेवण्याची सूचना मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी केली़ प्रशासनाने सीसीटीव्ही न बसविल्यास मनसेतर्फे बसविण्यात येतील, असा इशाराही दिला.