जिल्हावासीयांनी उगारले उपोषणाचे हत्यार

By Admin | Updated: December 22, 2014 22:53 IST2014-12-22T22:53:23+5:302014-12-22T22:53:23+5:30

जिल्ह्यात विकासाची आणि प्रगतीची गंगा वाहत असतानाच विविध मागण्यांसाठी आंदोलनाला आजही नागरिकांना रस्त्यावर उतरण्याची वेळ येत आहे

District residents raised the fast of fasting | जिल्हावासीयांनी उगारले उपोषणाचे हत्यार

जिल्हावासीयांनी उगारले उपोषणाचे हत्यार

जिल्ह्यात विकासाची आणि प्रगतीची गंगा वाहत असतानाच विविध मागण्यांसाठी आंदोलनाला आजही नागरिकांना रस्त्यावर उतरण्याची वेळ येत आहे. आजच्या दिवशी अलिबागेतील १४ शेतकऱ्यांनी जमीन खारभूमीपासून वाचविण्याकरिता जीवन संपविण्याचा निर्णय घेतला असताना वसतिगृहातील समस्या सोडविण्याकरिता कर्जत, पनवेलमधील आदिवासी विद्यार्थ्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे, तर मुरूडमधील एका मजुराने अनधिकृत बांधकामाविरोधात एकट्याचाच लढा चालू ठेवला आहे. या सगळ्यांनाच अपेक्षा आहे ती शासनाच्या उत्तराची...

१४ शेतक-यांचा आत्मदहनाचा इशारा

आविष्कार देसाई, अलिबाग
खारबंदिस्ती उद्ध्वस्त झाल्याने सोने पिकविणाऱ्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले. पोटाला चिमटा काढून आयुष्य जगणाऱ्या बळीराजाचे हे विदारक चित्र गेल्या २२ वर्षापासून अलिबाग तालुक्यातील गावात पहायला मिळते. मायबाप सरकार आणि जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांच्या या जीवन मरणाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नसल्यानेच अखेर १४ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेतला आहे.
अलिबाग तालुक्यातील चंद्रकांत पाटील, सचिन पाटील, जितेंद्र पाटील, रमेश म्हात्रे, ज्ञानेश्र्वर म्हात्रे, समीर पाटील, नारायण पाटील, प्रदीप पाटील, महेश पाटील, गणेश पाटील, घनशाम म्हात्रे (रा.बहिराचा पाडा), मनिष म्हात्रे, विजय पाटील (शिरवली), कैलास गावंड (हाशिवरे) अशा १४ शेतकऱ्यांनी आत्मदहन करुन जीवनयात्रा संपविणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांना दिले आहे. सोनकोटे, हाशिवरे, नारंगी, शिरवली, वैजाळी, रामकोटा या परिसरातील सुमारे दहा हजार एकर शेतजमिनीत खारबंदिस्ती तुटून खारे पाणी घुसल्याने शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. गेल्या २२ वर्षापासून हीच स्थिती राहिल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल आहेत. खारबंदिस्तीची दुरुस्ती करावी, यासाठी जिल्हा प्रशासन आाणि सरकार दरबारी सातत्याने पत्रव्यवहार केला.२०१३ साली खारबंदिस्तीने हजारो एकर भातशेतीचे नुकसान झाल्याने पाच हजार सह्यांचे पत्र प्रशासनाला दिले होते, असे चंद्रकांत पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
येत्या १५ दिवसांमध्ये कामे मार्गी लागली नाहीत, तर आत्मदहन करण्याचा निर्धार शेतक-यांनी केला.

Web Title: District residents raised the fast of fasting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.