अपंग विद्यार्थ्याची मुंबई विद्यापीठाकडून अडवणूक

By Admin | Updated: November 23, 2015 01:31 IST2015-11-23T01:31:05+5:302015-11-23T01:31:05+5:30

अपंगत्वावर मात करून वाणिज्य शाखेत शिक्षण घेणाऱ्या योगेश गोपाळ जाधव या विद्यार्थ्याची दोन वर्षे मुंबई विद्यापीठाने अडवणूक केली.

Disabled by the University of Mumbai, the disabled student | अपंग विद्यार्थ्याची मुंबई विद्यापीठाकडून अडवणूक

अपंग विद्यार्थ्याची मुंबई विद्यापीठाकडून अडवणूक

नामदेव मोरे, नवी मुंबई
अपंगत्वावर मात करून वाणिज्य शाखेत शिक्षण घेणाऱ्या योगेश गोपाळ जाधव या विद्यार्थ्याची दोन वर्षे मुंबई विद्यापीठाने अडवणूक केली. गुणपत्रिका मिळविण्यासाठी पालकांना विद्यापीठात अक्षरश: ५० हेलपाटे मारावे लागले. अपंग विद्यार्थ्याला प्रोत्साहन देण्याऐवजी त्याचे मानसिक खच्चीकरण करण्याच्या या प्रकाराविषयी पालकांनी, अपंग संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
नवी मुंबईमधील कोपरखैरणेमध्ये राहणाऱ्या योगेशला लहानपणीच सेलेब्रल पाल्सी या आजाराने ग्रासले आहे. ६० टक्के अपंगत्व असल्यामुळे त्याला कोणाच्यातरी आधाराने बाहेर फिरावे लागते. अपंगत्वाने खचून न जाता योगेशने चांगले शिक्षण घेण्याचा निर्धार केला. सातारा जिल्ह्यातील उंबरी या अतिदुर्गम भागात राहणारे वडील गोपाळ जाधव व व आई विद्या यांनी मुलाला प्रोत्साहन देवून इंग्रजी माध्यमातून शिकविण्याचा निर्णय घेतला.
कोपरखैरणे परिसरातील एका चांगल्या खाजगी शाळेत त्याला प्रवेश घेतला. परंतु दहावीला तो नापास होईल व त्याचा परिणाम निकालावर होईल या भीतीने शाळेने त्याला नववीच्या वर्गात नापास केले. परंतु जिद्द न सोडता त्याने १७ नंबरचा अर्ज भरून परीक्षा दिली व चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाला.
वाणिज्य शाखेतून शिक्षण घेत बारावीला ७० टक्के गुण मिळविले. वाणिज्य शाखेतूनच (अकाऊंट व फायनान्स) मध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण पुर्ण करण्याचे व नंतर व्यवस्थापन शास्त्रामध्ये पदवी मिळविण्याचे स्वप्न उराशी बाळगून तो अभ्यास करू लागला. प्रत्येक वर्षी प्रथम वर्गात पास होणारा योगेश पदवीच्या शेवटच्या वर्षात एका गुणाने अनुत्तीर्ण झाला.
अंतिम वर्षात एका गुणाने अनुत्तीर्ण झाल्यानंतर खचून न जाता त्याने शिक्षकांच्या सल्ल्यावरून फेरतपासणीसाठी अर्ज केला. सप्टेंबर २०१३ मध्ये फेरतपासणीमध्ये उत्तीर्ण झाला. शिक्षकांसह पालकांना आनंद झाला. पण तो आनंद फार काळ टिकला नाही. त्याची गुणपत्रिका महाविद्यालयात आलीच नाही. वडिलांना विद्यापीठात जावून गुणपत्रिका घेवून येण्यास सांगितले. वडिलांनी विद्यापीठात जावून मुलाच्या गुणपत्रिकेसाठी अर्ज केला. परंतु त्यांना कोणीही प्रतिसाद दिला नाही. महाविद्यालयात जा, आम्ही तुम्हाला पत्र पाठवू अशी विविध कारणे सांगून गुणपत्रिका देण्याचे टाळण्यात आले.
विद्यापीठामधील कर्मचाऱ्यांना हात जोडून विनंती केली. या प्रकारामुळे मुलाचे मनोबल कमी होईल असे सांगूनही कोणीच दखल घेतली नाही. एका अधिकाऱ्याने पालकाला सहकार्य करत विद्यापीठाच्या लेटरहेडवर तो उत्तीर्ण झाला असल्याचे लिहून दिले. परंतु तो कागद कुठेही दाखविला तरी त्याच्याकडे संशयानेच पाहिले जात होते. चक्क दोन वर्षात गोपाळ जाधव यांनी विद्यापीठामध्ये ५० फेऱ्या मारल्या. अखेर तब्बल २ वर्षे २ महिने पाठपुरावा केल्यानंतर शुक्रवारी २० नोव्हेंबरला त्यांना गुणपत्रिका मिळाली.

Web Title: Disabled by the University of Mumbai, the disabled student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.