मुंबई - उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा जोरात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तासभर बंदद्वार चर्चा झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. असे असले तरी राज यांना सोबत घेण्याबाबत आशावादी असल्याची भूमिका उद्धवसेनेने घेेतली आहे.
भेटीत नेमके काय झाले, याबाबत दोन्ही बाजूंनी कोणतेही विधान केले नाही. मात्र, आगामी निवडणुकीच्या दृष्टीने यावेळी चर्चा झाल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.
भाजपची मनसेसोबत युती होणार नाही; पण एकनाथ शिंदे व मनसेची युती होऊ शकते, अशी शक्यता काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी वर्तवली. एखादे कुटुंब एकत्र येत असेल तर काँग्रेस त्याला नेहमीच समर्थन देते. पण ठाकरे बंधू एकत्र येणे भाजपला परवडणारे नाही. त्यामुळे भाजप अशी कोणतीही गोष्ट होऊ देणार नाही, असे ते म्हणाले.
भेटीकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची गरज नाही देवेंद्र फडणवीस यांचे सर्वच पक्षांतील नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे या भेटीकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची गरज नाही. आपल्या महाराष्ट्रात राजकारणापलीकडे संबंध ठेवण्याची प्रथा आहे, असे भाजपचे मंत्री नितेश राणे म्हणाले. मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनीही शिंदेसेनेचे नेते उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. मात्र, या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही, असे देशपांडे यांनी सांगितले.
आम्ही अजूनही एकत्र येण्यावर ठाम आहोत. आता राज ठाकरे यांनी ठरवायचे आहे की महायुतीसोबत जायचे की स्वत:च्या भावासोबत जायचे. मनसेने आपली भूमिका स्पष्ट केली तर आम्हाला आमची भूमिका ठरवावी लागेल. मुख्यमंत्र्यांना कोणीही भेटू शकते. उद्या मीही भेटू शकतो. त्यामुळे ही भेट राजकीय आहे, असे म्हणायचे कारण नाही. - ॲड. अनिल परब, नेते, उद्धवसेना