Join us  

Devendra Fadnavis: '२०२४ आधी आपलं सरकार आलं तर 'बोनस', नाहीतर...'; देवेंद्र फडणवीसांनी केला मोठा दावा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 6:08 PM

Devendra Fadnavis: भाजपाच्या कार्यकारणी समितीची बैठक आज मुंबईत पार पडली. यात राज्यातील भाजपाचे सर्व नेते, आमदार, प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Devendra Fadnavis: भाजपाच्या कार्यकारणी समितीची बैठक आज मुंबईत पार पडली. यात राज्यातील भाजपाचे सर्व नेते, आमदार, प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर शेलक्या शब्दांत टीका केली. 

"राज्यातलं सध्याचं सरकार सर्वच पातळ्यांवर फोल ठरत असून जनतेच्या कल्याणा करता आपल्याला मैदानात उतरावच लागेल. २०२४ आधी राज्यात आपलं सरकार आलं तर बोनस समजू. तसं जर झालंच तर जनतेला उत्तम पर्याय आपण देऊच. पण येणाऱ्या काळात भाजपाचं स्वत:च्या भरवशाचं स्वत:चं सरकार आपण आणून दाखवू", असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी कोरोना संकट, वीजबील थकबाकी, लसीकरण, शेतकरी कर्जमुक्ती योजना, कुपोषण, इंधन दरकपात अशा सर्वच मुद्द्यांवर भाष्य करत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. "सरकार दररोज तोंडावर पडतंय आणि संपूर्ण जनता हे पाहात आहे. मोदीजींचं अभूतपूर्व काम आपल्या पाठिशी आहे. त्यांच्या कामाच्या जोरावर आपण जनतेत जाऊ आणि येणाऱ्या काळात आपल्याला युद्धाला तयार राहावं लागेल. आता काही लोक बोलतील हे युद्ध काय शस्त्रांनी लढायला जाणार आहेत का? पण जनतेच्या कल्याणाकरता आपल्याला मैदानात उतरावच लागेल. पहिल्यांदा यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पाणी पाजू आणि २०२४ आधी राज्यात आपलं सरकार जर आलंच तर ते आपण 'बोनस' समजू. त्यापरिस्थितीतही उत्तम पर्याय देण्याचं काम आपण करु. पण येत्या काळात राज्यात स्वत:च्या भरवशाचं आणि आपलं सरकार आणून दाखवू असा मला विश्वास आहे", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

लसीकरणात मोदींनी जगासमोर आदर्श निर्माण केलाकोरोना विरोधी लसीकरणात भारतानं केलेल्या विक्रमाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील लसीकरणावरही भाष्य केलं. "देशात महाराष्ट्रात सर्वाधिक लसीकरण झालं असं आज राज्य सरकार सांगतंय. ते चांगलंच आहे. आपला महाराष्ट्र लसवंत होतोय याचा अभिमानच आहे. पण राज्याला या लसी दिल्या कुणी? मोदींनी महाराष्ट्र राज्याकडून होणाऱ्या टीका बाजूला ठेवून राज्याला सर्वतोपरी मदत करण्याचीच भूमिका ठेवली", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

काँग्रेसचे नेते राहुल गांधी त्यावेळी परदेशी लसींना मान्यता देण्यासाठी ओरडत होते आणि मोदींवर टीका करत होते. पण मोदींनी स्वदेशी लसीच्या पाठिशी ठामपणे उभं राहून वैज्ञानिकांना प्रोत्साहन दिलं, एकरकमी पैसा दिला आणि आवश्यक अशी सर्व मदत केली म्हणून आज देशातील १०० कोटी जनतेचं लसीकरण झालेलं आहे, असंही फडणवीस म्हणाले. आज जर देशात लसीकरण वेगानं झालं नसतं तर आजही अर्थव्यवस्था थांबलेली असती. पण आज आपली अर्थव्यवस्था धावतेय आणि जगात सर्वाधिक वेगानं प्रगती करणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे पाहिलं जात आहे याचं सारं श्रेय मोदींचं आहे, असंही फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसभाजपा