महाडला प्रदूषणाचा विळखा
By Admin | Updated: May 30, 2014 00:26 IST2014-05-30T00:26:14+5:302014-05-30T00:26:14+5:30
औद्योगिक वसाहतीमुळे महाड तालुका आणि परिसरातील बेरोजगारीचा प्रश्न निकाली निघेल, अशी आशा बाळगणार्या महाडकरांच्या औद्योगिक वसाहतीतील प्रदूषण जिवावर बेतण्याची वेळ आली आहे.

महाडला प्रदूषणाचा विळखा
सिकंदर अनवारे, दासगांव - औद्योगिक वसाहतीमुळे महाड तालुका आणि परिसरातील बेरोजगारीचा प्रश्न निकाली निघेल, अशी आशा बाळगणार्या महाडकरांच्या औद्योगिक वसाहतीतील प्रदूषण जिवावर बेतण्याची वेळ आली आहे. प्रदूषण करणार्या कारखानदारांवर प्रदूषण नियंत्रण मंडळ, न्यायालय कारवाया आणि शिक्षा करीत आहेत. पण प्रदूषणाची शिक्षा भोगणार्या महाडकरांना मात्र यातून सुटण्याचा मार्ग दिसत नाही. सावित्री, गांधारी आणि काळ या नद्यांच्या तिरावर महाड तालुका वसला आहे. पुरातन अशा या महाड तालुक्यात शेती आणि मासेमारी हा येथील रहिवाशांचा मूळ व्यवसाय आहे. नदी आणि खाडीच्या पाण्यातून बुडी मारुन वाळूउपसा करण्याचा जोडधंदा येथील रहिवाशांनी शोधून काढला होता. महाड तालुक्यातील बिरवाडी विभागातील सुपीक जमीन ताब्यात घेऊन महाराष्टÑ शासनाने त्या ठिकाणी औद्योगिक वसाहतीची उभारणी केली. या औद्योगिक वसाहतीमुळे महाडकरांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. भावी पिढीला नोकरी, शिक्षणासाठी मोठ्या शहराचा मार्ग धरावा लागणार नाही, असे स्वप्न त्यावेळी दाखविण्यात आले. औद्योगिक वसाहतींच्या रुपाने महाडमध्ये प्रदुषणाचा भस्मासुर मोठा होत असल्याचे कोणालाही समजले नाही. औद्योगिक वसाहत सुरु होताच येथील रासायनिक कारखानदारांनी कारखान्यातून निघणारे सांडपाणी काळ नदीत सोडण्यास सुरुवात केली. यामुळे औद्योगिक क्षेत्रातील काळ नदी आणि पुढे सावित्री नदीचे पाणी प्रदुषित झाले. महाडची औद्योगिक वसाहत आजही हे सांडपाणी ओवले गावाहद्दीत खाडी पाथरात रस्त्यांलगत सोडते. यामुळे आता औद्योगिक वसाहतीपेक्षाही महाडच्या दासगांव खाडीपट्ट्यात प्रदुषणाचा प्रश्न भीषण बनला आहे. खाडीच्या या प्रदुषणामुळे येथील रहिवाशांचा पारंपारिक मासेमारी प्रदुषित पाण्यातील खाडीतील मासे प्रदुषित झालेल्या जलस्त्रोतांचे पाणी वापरात आल्यामुळे खाडीपट्ट्यातील अनेक रहिवाशांना त्वचेचे रोग, श्वसनाचे रोग आदी दुर्धर रोगांची लागण झाली आहे.