रामदास कदम यांच्या विरोधात उपमहापौरांची तक्रार
By Admin | Updated: June 8, 2015 22:51 IST2015-06-08T22:51:05+5:302015-06-08T22:51:19+5:30
पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या भाषणाविरोधात वसई विरारचे उपमहापौर रुपेश जाधव यांनी तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

रामदास कदम यांच्या विरोधात उपमहापौरांची तक्रार
वसई : पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या भाषणाविरोधात वसई विरारचे उपमहापौर रुपेश जाधव यांनी तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या प्रती निवडणूक निर्णय अधिकारी व राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्या आहेत. यामध्ये मतदारांना धमकावणे, तसेच समाजात तेढ निर्माण करणे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
निवडणूक प्रचारासाठी सेना-भाजपा युतीने गेल्या गुरूवारी गालानगर नालासोपारा पूर्व भागात जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्या सभेत व्यासपीठावर युतीचे सर्व उमेदवार, खासदार चिंतामण वनगा, खासदार कपिल पाटील, मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव, ठाण्याचे माजी महापौर अनंत तरे व पर्यावरणमंत्री रामदास कदम आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आपल्या भाषणात राज्यातील विविध जातीय दंगली व पाकिस्तान धार्जिण्या मुस्लीमांचा वारंवार उल्लेख केला. त्यामागे धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न होता, असे तक्रारीत म्हटले आहे.
महानगरपालिकेच्या विकासकामांवर भाष्य करण्याऐवजी युतीला निवडून न दिल्यास महापालिकेला विविध योजना पूर्ण करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून निधी दिला जाणार नाही, असे अप्रत्यक्षरित्या सुचवून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांना उद्देशून तुम्ही दादागिरी केली तर, मी ही भाई आहे, आता पोलीस माझ्या बरोबर आहेत. दोन तासासाठी नाही, दोन दिवसांसाठी नाही तर, दोन महिने तुम्हाला तुरूंगात पाठवीन, मी येथे आलो आहे, तो कायमचा निकाल लाऊनच १६ तारखेला येथून जाईन, असे म्हटल्याचेही निवेदनात नमूद केले आहे.
सत्ता आणि अधिकाराचा दुरूपयोग करणारी वक्त व्ये करून कदम यांनी मतदारांना प्रभावित करण्याचा तसेच विरोधकांवर दबाव आणून मतदानाच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला आहे. सदर बाब निवडणूक आचारसंहितेचा भंग करणारी असल्याचे म्हटले आहे.
काय बोलले रामदास?
> भाईगिरी मोडण्यासाठी मला गृहमंत्री व्हायचे आहे. आम्ही मालवणातल्या एका भाईची भाईगिरी मोडून काढली. त्याच्या आधी उल्हासनगरमधल्या भाईची भाईगिरी मोडीत काढली. मुंबईतील एका बड्याची भाईगिरी संपुष्टात आणली. भार्इंदरच्या भाईचाही असाच अस्त घडविला. आता इथली भाईगिरी मी संपविणार आहे. काहींना तुरुंगात टाकण्यासाठी मला होममिनिस्टर व्हायचे आहे.