नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग अपुरेच
By Admin | Updated: September 1, 2014 04:38 IST2014-09-01T04:38:14+5:302014-09-01T04:38:14+5:30
मुंबईत दिवसाला शेकडो बालके जन्माला येतात, मात्र बालकांची प्रकृती गंभीर असल्यास त्यांना अतिदक्षता विभागामध्ये जागा मिळवण्यासाठी प्रतीक्षेत राहावे लागते.

नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग अपुरेच
पूजा दामले, मुंबई
मुंबईत दिवसाला शेकडो बालके जन्माला येतात, मात्र बालकांची प्रकृती गंभीर असल्यास त्यांना अतिदक्षता विभागामध्ये जागा मिळवण्यासाठी प्रतीक्षेत राहावे लागते. मुंबईतील महापालिकेच्या तीन प्रमुख रुग्णालयांमध्ये, जेजे आणि कामा रुग्णालयांमध्ये मिळून निओनॅटल इंटेसिव्ह केअर युनिटमध्ये (एनआयसीयू) १६५ खाटा आहेत. या खाटा नेहमीच फुल्ल असतात.
मुंबईतील महापालिकेच्या नायर, केईएम आणि सायन रुग्णालयामध्ये आणि सरकारच्या जेजे आणि कामा रुग्णालयामध्ये दररोज शेकडो मुले जन्माला येत असतात. जन्माला येणाऱ्या प्रत्येक बालकाला एनआयसीयूमध्ये ठेवण्याची गरज नसते. मात्र जन्माला येणाऱ्या मुलांपैकी १ टक्का मुलांना तरी एनआयसीयूमध्ये ठेवण्याची गरज भासते. काही बालकांना काही तास म्हणजे ७ - ८ तास जरी देखरेखीखाली ठेवले तरी त्यांच्यात सुधारणा होते. मात्र काही बालके ही अशक्त असतात़ यामुळे या बालकांना काही दिवस एनआयसीयूमध्ये ठेवण्याची गरज भासते. मुंबईतील या प्रमुख ५ रुग्णालयांमध्ये नेहमीच एनआसीयू फुल्ल असतात. यामुळे अनेकदा बालकांना एनआयसीयूमध्ये खाट मिळेपर्यंत प्रतीक्षेत राहावे लागते. बालक अतिशय गंभीर असल्यास एनआयसीयूमध्ये जागा नसतानाही त्यांना तिथे दाखल करण्यात येते, असे महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांचे म्हणणे आहे.
जन्माला आल्यावर मुलाचे वजन कमी असल्यास त्याला एनआयसीयूमध्ये ठेवावे लागते. १ किंवा दीड किलो वजनाचे बाळ जन्माला आले तर त्याला विशेष देखरेखीखाली ठेवावे लागते. काहीवेळी जन्माला आलेल्या बाळाला श्वास घ्यायला त्रास होतो. आईच्या पोटातले पाणी सुकले असेल तर जन्माला आलेल्या बाळाला एनआयसीयूत ठेवावे लागते. जन्माला आलेल्या प्रत्येक बाळाला एनआयसीयूची गरज नसते, असे कामा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. राजश्री कटके यांनी सांगितले.
सायन रुग्णालयातील एनआयसीयूमध्ये एकूण ३८ खाटा आहेत. या खाटा नेहमीच भरलेल्या असतात. मात्र एखादी इर्मजन्सी आली तर आम्ही त्या बालकाला दाखल करून घेतो. बालकाची प्रकृती अतिशय गंभीर असल्यास त्याला आम्हाला दाखल करून घ्यावे लागते. अनेकदा खासगी रुग्णालयात जन्माला आलेल्या बालकांची प्रकृती ढासळल्यास महापालिकेच्या रुग्णालयात पाठवले जाते. एनआयसीयूतील खाटांची संख्या वाढवली, आणि त्याचबरोबरीने कर्मचाऱ्यांची संख्यादेखील वाढली तर त्याचा उपयोग होईल, असे सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.