पाच हजार मुस्लिम बांधवांचा आरक्षणाकरिता मूकमोर्चा
By Admin | Updated: March 26, 2015 22:39 IST2015-03-26T22:39:19+5:302015-03-26T22:39:19+5:30
राज्यात नव्याने सत्तेवर आलेल्या सरकारने फेब्रुवारी - मार्च २०१५ च्या निर्णयाद्वारे शैक्षणिक व सरकारी-निमसरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण रद्द केले आहे.

पाच हजार मुस्लिम बांधवांचा आरक्षणाकरिता मूकमोर्चा
अलिबाग : राज्यात नव्याने सत्तेवर आलेल्या सरकारने फेब्रुवारी - मार्च २०१५ च्या निर्णयाद्वारे शैक्षणिक व सरकारी-निमसरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण रद्द केले आहे. मुस्लिम समाजाच्या हिताविरुद्ध असलेला हा निर्णय रद्द करण्याची मागणी मुस्लिम बांधवांनी मूकमोर्चा काढून केली.
रायगड जिल्ह्यातील एकूण २७२ मुस्लिम वस्ती असलेल्या ग्रामस्थांच्या संयुक्त संघटनेचे अध्यक्ष अली अब्दुला कौचाली, उपाध्यक्ष असगर दादामिया मुल्ला, सेक्रेटरी जाफरखान देशमुख, रायगड जिल्हा मुस्लिम संघर्ष समितीचे इम्तियाज पालकर, अलिबागचे माजी नगरसेवक लतिफ घट्टे, कैसर दणदणे, नसिम बुकबार्इंडर आदींच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सुमारे पाच हजार मुस्लिम बांधवांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मूक मोर्चाचे आयोजन केले होते.
हिराकोट तलावाजवळ मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. अली अब्दुला कौचाली, रायगड जिल्हा मुस्लिम संघर्ष समितीचे इम्तियाज पालकर, मुश्ताक घट्टे आदींनी मोर्चाच्या अनुषंगाने उपस्थित मुस्लिम बांधवांना संबोधित केले. अली अब्दुला कौचाली व इम्तियाज पालकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांना दिले. शासनास कळविण्यात येतील, असे आश्वासन जिल्हाधिकारी भांगे यांनी शिष्टमंडळाला दिले. (विशेष प्रतिनिधी)