Join us  

मंत्रालयाच्या सज्जावर चढलेल्या शेतक-याला खाली उतरवण्यात यश, मंत्र्यांनी 45 मिनिटांनी घेतली दखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2017 4:35 PM

मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील सज्जावर चढलेल्या तरुण शेतक-याला अखेर सुरक्षितरित्या खाली उतरवण्यात आले आहे.

मुंबई -  मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील सज्जावर चढलेल्या तरुण शेतक-याला अखेर सुरक्षितरित्या खाली उतरवण्यात आले आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी या शेतक-याची समजूत घालून त्याला सुखरुप खाली उतरवले. ज्ञानेश्वर साळवे असे या तरुण शेतक-याचे नाव असून, तो उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील आहे. 

ज्ञानेश्वर साळवे आज कृषीमंत्र्यांना भेटण्यासाठी मंत्रालयात आला होता. पण कृषीमंत्र्यांची भेट न मिळाल्याने अखेर त्याने सातव्या मजल्याच्या सज्जावर चढून आंदोलन सुरु केले. कृषीमंत्र्यांची भेट घडवून द्या अन्यथा उडी मारेन अशी धमकी त्याने दिली होती. अखेर ब-याच प्रयत्नानंतर या युवकाची समजूत काढण्यात यश आले. तब्बल दीड तास हा सर्व प्रकार सुरु होता. यावेळी एकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. 

महत्वाच म्हणजे मंत्रालयात नेहमीच मंत्री, अधिकारी वर्ग उपस्थित असतो. पण मंत्रालयामध्ये हे सर्व घडत असताना मंत्रिमहोदयांनी तब्बल पाऊणतासाने दखल घेतली.  फक्त कृषीमंत्र्यांची भेट मिळावी म्हणून  एका शेतक-यांने  जीवाचा धोका पत्करला होता. सर्वप्रथम रणजित पाटील घटनास्थळी पोहोचले त्यानंतर पाठोपाठ विनोद तावडे, दीपक केसरकर आले. 

टॅग्स :मंत्रालयमुंबई