उशिरा येणा-यांना बसणार रजेचा फटका
By Admin | Updated: August 4, 2014 00:49 IST2014-08-04T00:49:02+5:302014-08-04T00:49:02+5:30
ठाणे महापालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये उशिरा येणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर नियंत्रण राखण्यासाठी बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.

उशिरा येणा-यांना बसणार रजेचा फटका
घोडबंदर : ठाणे महापालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये उशिरा येणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर नियंत्रण राखण्यासाठी बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. यानुसार आता १ आॅगस्टपासून तीन दिवस उशिरा येणाऱ्यांना एक दिवसाच्या किरकोळ रजा कपातीचा फटका सहन करावा लागणार आहे. मात्र, आदेशच १ आॅगस्ट रोजी कार्यालायांना प्राप्त झाल्यामुळे आदेशाची अंमलबजावणी करण्यात अडसर निर्माण झाला आहे.
या बायोमेट्रिक हजेरी मशीनमध्ये उशिरा येणाऱ्यांची नोंद झाली तरी, कार्यालयातील मस्टरवर योग्य वेळ नोंदविली जाणार. तर या मशीनचा काही उपयोग होणार नाही. तसेच ही मशीनही काही दिवसांनी खराब केली जाणार नाही, याची शाश्वती कोण देणार? असा सवाल केला जात आहे. अनेक कर्मचारी वेळेत येऊन बायोमेट्रिक हजेरी लावतात. कार्यालयातून गायब होतात.त्यांच्यावर कसे नियंत्रण मिळवणार असा प्रश्न कर्मचारी करीत आहेत. कार्मिक विभागाने यापूर्वी दक्षता कमिटी बनवून कुठच्याही कार्यालयाला अचानक भेट देवून हजेरी मस्टर तपासले जायचे. त्यामुळे कर्मचारी शिस्तीत कामावर येत होते. परंतु ही कमिटी बरखास्त करून हजेरी मशीनचा फंडा करण्यात आला.यासाठी काही लाखांचा खर्च केला जातो.त्याऐवजी दक्षता कमिटी पुनर्जीवित केली असती तर,पैशांचा अपव्यय टाळता आला असता. नागरी सुविधा केंद्रातील कार्यालयीन अधीक्षक तसेच प्रभागातील कार्यालयीन अधीक्षकांना उशिरा येणाऱ्यांचा अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. परंतु हा आदेशच उशिरा प्राप्त झाल्याने व कामकाज कसे करायचे यासंदर्भात वरिष्ठांनी कुठचेही मार्गदर्शन केले नसल्यामुळे हे काम पिहल्याच दिवशी रेंगाळले असल्याचे नागरी सुविधा केंद्रातून सांगण्यात आले. (वार्ताहर)