घर कोसळून चौघांचा मृत्यू
By Admin | Updated: July 13, 2014 02:22 IST2014-07-13T02:22:19+5:302014-07-13T02:22:19+5:30
चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शिवडीत एका इमारतीची बाल्कनी कोसळून दोघांचा मृत्यू झाला, तर कुलाब्यात बांधकाम सुरू असलेले घर कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला

घर कोसळून चौघांचा मृत्यू
कुलाबा, शिवडीतील घटना
मुंबई : चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शिवडीत एका इमारतीची बाल्कनी कोसळून दोघांचा मृत्यू झाला, तर कुलाब्यात बांधकाम सुरू असलेले घर कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला असून यात पाच जण जखमी झाले आहेत. तर मालाड पूर्वेला भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाला.
शिवडीतील जयभीमनगर परिसरात असलेल्या लकी मेन्शन या इमारतीच्या खाली त्रिभुवनदास उपाध्याय यांची पानपट्टी आहे. याच ठिकाणी ते त्यांचा भाऊ उद्रमणी उपाध्याय आणि मित्र दयाशंकर शर्मा यांच्यासोबत राहत होते. शुक्रवारी रात्री 11 वाजता इमारतीच्या बाल्कनीचा भाग अचानक या तिघांवर कोसळला. यामध्ये तिघेही जखमी झाले. तिघांना जे.जे. रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र, उपचारापूर्वीच दयाशंकर आणि उद्रमणी यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी शिवडी पोलिसांनी इमारतीचे मालक डी. इब्राहिम याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे. दुसरी घटना आज सकाळी कुलाबा परिसरात घडली असून यात एकाचा मृत्यू झाला आहे. येथील प्रकाश पेठे मार्गावरील गणोशमूर्तीनगरात राहणारे मोहंमद शेख यांच्या घराचे गेल्या आठ दिवसांपासून बांधकाम सुरू होते. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सामानाचा भार जास्त झाल्याने हा पोटमाळा खाली कोसळला. त्यात मुश्रफ शेख (18) या तरुणाचा मृत्यू झाला.
भिंत कोसळून मुलगा ठार
मालाड पूर्वेकडील वाघेश्वरी मंदिराच्या कुंपणाची भिंत शनिवारी दुपारी कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका मुलाचा दूर्देवी मृत्यू झाला. सुधीर घनश्याम चव्हाण(12) असे त्याचे नाव आहे. भिंतीलगत हा मुलगा असताना भिंत त्याच्यावर कोसळली. या दुर्घटनेत तो जखमी झाला. कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात त्याला उपचार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. शिवाय या दुर्घटनेत आणखी एका इसमाच्या डोक्याला जखम झाली असून, त्याची ओळख पटलेली नाही. (प्रतिनिधी)