‘मरे’वरील डीसी, एसी परावर्तन पूर्ण
By Admin | Updated: June 9, 2015 04:10 IST2015-06-09T04:10:53+5:302015-06-09T04:10:53+5:30
मध्य रेल्वेवर डीसी (१,५00 व्होल्ट अल्टरनेट करंट) ते एसी (२५,000 व्होल्ट अल्टरनेट करंट) परावर्तनाचे काम सीएसटी ते ठाणेपर्यंत अखेर सोमवारी पहाटे पूर्ण करण्यात आले.

‘मरे’वरील डीसी, एसी परावर्तन पूर्ण
ताशी १00 किलोमीटर वेग शक्य : परावर्तनाच्या पहिल्याच दिवशी ६५ लोकल रद्द
मुंबई : मध्य रेल्वेवर डीसी (१,५00 व्होल्ट अल्टरनेट करंट) ते एसी (२५,000 व्होल्ट अल्टरनेट करंट) परावर्तनाचे काम सीएसटी ते ठाणेपर्यंत अखेर सोमवारी पहाटे पूर्ण करण्यात आले. या परावर्तनामुळे लोकल गाड्यांचा वेग वाढण्यास मदत मिळणार असून, लोकल ताशी १00 किमी वेगाने धावू शकतील. हे परावर्तन पूर्ण झाल्यानंतर काही दिवस लोकल सेवा विस्कळीतच राहील, असे मध्य रेल्वेकडून याआधीच स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार परावर्तन होताच सोमवारी पहिल्याच दिवशी ६५ लोकल रद्द झाल्याचे सांगण्यात आले.
मध्य रेल्वेमार्गावर सीएसटी ते कल्याणपर्यंत १९२५ साली डीसी परावर्तन करण्यात आले होते. त्यानंतर या मार्गावर डीसी परावर्तनाच्या लोकलच धावत होत्या. त्यामुळे गाड्यांचा वेग कमी असण्याबरोबरच विजेची बचतही होत नव्हती. तसेच नवीन लोकलही आणणे मध्य रेल्वेला शक्य होत नव्हते. त्यामुळे या संपूर्ण मार्गावर डीसी ते एसी परावर्तन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार एकूण १,२९९ कोटी ९१ लाख रुपये खर्च असलेल्या या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यात प्रथम ठाणे ते कल्याण आणि नंतर सीएसटी ते एलटीटी पाचवा-सहावा मार्गावरील परावर्तनाचे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर ठाणे ते सीएसटीपर्यंत चार मार्गांवरील काम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. हे कामही अखेर रविवारच्या मध्यरात्री १२ ते सोमवारी पहाटे सहापर्यंत विशेष ब्लॉक घेऊन पूर्ण करण्यात आले. हे काम पूर्ण झाल्यामुळे लोकलचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. ताशी १00 किमी वेगाने लोकल धावू शकतील आणि ३३ टक्के विजेची बचत होईल, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. तसेच लोकलच्या फेऱ्याही वाढतानाच नवीन लोकलही धावणे शक्य होणार आहे.
दरम्यान, परावर्तनाचे काम झाल्यानंतर एसी परावर्तनाला स्थिरता येईपर्यंत काही दिवस लोकल सेवा विस्कळीत राहतील, असे मध्य रेल्वेकडून याआधीच स्पष्ट करण्यात आले होते. तसेच परावर्तनाच्या कामासाठी रेल्वेकडून रविवारी रात्री बारा ते सोमवारी पहाटे ६ वाजेपर्यंत ब्लॉकही घेण्यात आला होता. त्या वेळेत लोकल धावू शकणार नसल्याची मध्य रेल्वेकडून माहिती देण्यात आली होती. या सर्व कारणांमुळे सोमवारी सकाळी सहानंतर लोकल सेवांना फटका बसण्यास सुरुवात झाली. सकाळच्या सुमारास सीएसटीकडे जाणाऱ्या आणि सीएसटीहून सुटणाऱ्या लोकल अर्धा तास उशिराने धावत होत्या. त्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना त्याचा मोठा फटका बसत होता.
रविवारी रात्रीही लोकल बंद झाल्याने या कामाची माहिती नसलेल्या अनेकांना संपूर्ण रात्र प्लॅटफॉर्मवरच काढावी लागली. सोमवारी दिवसभरात एकूण ६५ लोकल रद्द झाल्या, तर ५१ लोकल अंशत: रद्द करण्यात आल्या. त्याचप्रमाणे ५00 पेक्षा जास्त लोकल गाड्यांना लेट मार्क लागल्याचे सांगण्यात आले. रात्री उशिरापर्यंत लोकल गाड्या रद्द होण्यात वाढ होऊ शकते, असा अंदाज रेल्वे अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आला.
परावर्तनानंतर ‘मरे’ला कावळ्यांचा त्रास
एसी परावर्तन झाल्यामुळे ओव्हरहेड वायरमधून तब्बल २५ हजार विद्युत प्रवाह जात आहे. त्यामुळे हा प्रवाह सर्वात जास्त धोकादायक आहे. परावर्तन झाल्यानंतर मध्य रेल्वेमार्गावरील काही ठिकाणी जलद लोकल धावत असतानाच ओव्हरहेड वायरचा मोठा स्फोट झाल्याचा आवाज येत होता. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरत होती. तर काही ठिकाणी ओव्हरहेड वायरवर कावळा बसल्यानेही स्फोट होत होते. यामुळे तर ओव्हरहेड वायर तुटण्याचीही घटना सीएसटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. अर्ध्या तासात त्याची दुरुस्ती केली.
हार्बरवर एसी परावर्तनासाठी दीड वर्ष प्रतीक्षा
पश्चिम रेल्वेबरोबरच मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरही एसी परावर्तनाचे काम पूर्ण झाले. आता मात्र हार्बरवर एसी परावर्तनाचे काम बाकी असून, या कामासाठी तब्बल दीड वर्ष लागेल, असे मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे नवीन लोकल मिळण्यासही हार्बरला प्रतीक्षाच करावी लागणार आहे.