दहावीचे पेपर तपासणीचे काम होणार ठप्प ?
By Admin | Updated: March 13, 2015 01:31 IST2015-03-13T01:31:51+5:302015-03-13T01:31:51+5:30
शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीने दहावी परीक्षेचे पेपर तपासण्यावर बहिष्कार टाकला आहे.

दहावीचे पेपर तपासणीचे काम होणार ठप्प ?
मुंबई : शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीने दहावी परीक्षेचे पेपर तपासण्यावर बहिष्कार टाकला आहे. या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाने पाठिंबा जाहीर केल्याने पेपर तपासणीचे काम ठप्प होण्याची शक्यता आहे.
मूल्यांकनानुसार अनुदानास पात्र ठरलेल्या विनाअनुदानित शाळांची त्रयस्थ समितीमार्फत झालेली फेरतपासणी रद्द करण्याचे आश्वासन शालेय शिक्षणमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले होते.
समितीने याबाबत आंदोलनाचा इशारा दिल्यानंतरही शासनाने याबाबत कोणताच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे समितीने दहावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला असून मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलनही सुरू केले आहे.
शिक्षण मंडळाकडून तपासणीसाठी पाठविण्यात आलेले दहावीचे पेपर शिक्षकांनी परत पाठविले आहेत. यातच माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाने शाळा कृती समितीच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यामुळे हे आंदोलन अधिकच चिघळण्याची शक्यता असून त्यामुळे दहावीच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)