गणेशोत्सवातील वीजचोरीवर दामिनीचा वॉच

By Admin | Updated: August 29, 2015 23:13 IST2015-08-29T23:13:53+5:302015-08-29T23:13:53+5:30

मागील वर्षी प्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या काळात चोरुन वीज वापरणाऱ्यांवर महावितरणचे दामिनी पथक वॉच ठेवणार आहे. चोरुन वीज वापरण्याऐवजी गणेशोत्सव मंडळांनी तात्पुरत्या स्वरुपात

Damini's Watch on Ganesh Festival's Power Chart | गणेशोत्सवातील वीजचोरीवर दामिनीचा वॉच

गणेशोत्सवातील वीजचोरीवर दामिनीचा वॉच

ठाणे : मागील वर्षी प्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या काळात चोरुन वीज वापरणाऱ्यांवर महावितरणचे दामिनी पथक वॉच ठेवणार आहे. चोरुन वीज वापरण्याऐवजी गणेशोत्सव मंडळांनी तात्पुरत्या स्वरुपात अधिकृत वीज कनेक्शन घेऊन निर्वीघ्नपणे हा उत्सव साजरा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात गेल्या काही वर्षात अनधिकृतपणे वीज जोडणी घेऊन उत्सव साजरा केला जात असल्याचे प्रमाण वाढले होते. त्याला आळा बसावा यासाठी महावितरणने दामिनी या विशेष पथकाची निर्मिती करुन त्याद्वारे चोरुन वीज वापरणाऱ्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली होती. त्यानुसार मागील वर्षी या पथकाने गणेशोत्सवाच्या काळात जनमित्रांच्या सहाय्याने वीजचोरीचे १० प्रकार ठाणे महापालिका हद्दीत पकडले होते. परंतु त्यांच्याकडून कोणत्याही स्वरुपाचे दंड न आकारता त्यांना तात्पुरत्या स्वरुपात अधिकृत वीज जोडणी दिली होती. त्यानुसार यंदाही हे पथक अशा चोरुन वीज वापरणाऱ्या मंडळांवर आपली करडी नजर ठेवणार आहे. या पथकात कार्यकारी अभियंत्याबरोबर अन्य चार ते पाच कर्मचारी वर्ग काम करीत आहेत.
महावितरणने उचलेल्या या पावलामुळे २०११ पासून ठाण्यासह विविध भागातील गणेश मंडळांनी अधिकृत जोडणी घेणे पसंत केले आहे. मागील चार वर्षात हे प्रमाण अधिकच वाढल्याने या काळात आता वीज चोरीचे प्रमाण कमी झाले असल्याचा दावा महावितरणने केला आहे. २०११ मध्ये ठाणे मंडळातील २५५ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी अधिकृतपणे तात्पुरत्या स्वरुपात वीज जोडणी करुन घेतली होती. तर २०१२ मध्ये २७२, तसेच २०१३ मध्ये ४५५ तर २०१५ मध्ये ४८० गणेश मंडळांनी अधिकृत वीजपुरवठा घेतला होता.
दरम्यान आकडे टाकून तसेच अनधिकृत वीज घेण्याच्या प्रकारामुळे अपघाताची शक्यता वाढते. त्यामुळे गणेश मंडळांनी आॅनलाईन अथवा परिसरातील महावितरणच्या कार्यालयात जाऊन हंगामी स्वरुपाच्या वीज जोडणीसाठी अर्ज करुन जोडणी घ्यावी व उत्सव साजरा करावा असे आवाहन भांडुप नागरी परिमंडळाचे मुख्य अभियंता सतीश करपे यांनी केले आहे. तसेच चोरुन वीज घेणाऱ्यांवर दामिनी पथकाची करडी नजर राहणार असून दोषी मंडळांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे यंदा वीजजोडणी घेणाऱ्या मंडळांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

अशी मिळेल वीजजोडणी...
तात्पुरता वीजपुरवठा घेण्यासाठी मंडळांनी महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेत स्थळावरुन नवीन वीज जोडणीसाठी आॅनलाईन अर्ज दाखल करावेत. त्यासोबत आवश्यकतेनुसार स्थानिक सक्षम अधिकारी अथवा पोलीस अधिकाऱ्यांचे नाहरकत प्रमाणपत्र व वीज जोडणीचा चाचणी अहवाल देणे गरजेचे आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व रकमेचा भरणा केल्यानंतर तत्काळ वीजजोडणी मंजूर केली जाईल, असे महावितरणे स्पष्ट केले आहे. तसेच ज्या गणेशोत्सव मंडळांना ७ किलो वॅट पर्यंतचा वीज भार हवा आहे, अशांनी संबधींत परिसरातील शाखा कार्यालयाशी संपर्क साधवा, ज्या मंडळांना ७ किलो वॅटपेक्षा जास्त वीज भार हवा असेल त्यांनी विभागीय कार्यालयाकडे अर्ज करावा असे आवाहनही महावितरणने केले आहे.

घरगुती वापरापेक्षा कमी दरात पुरवठा...
सध्या घरगुती वापराचा दर हा १०० युनिटपर्यंत ३.७६ रुपये असा आहे. त्यानंतर ३०० युनिटपर्यंत त्यात वाढ होते. तसेच पुढील युनिटमध्येही वाढ होत जाते. परंतु गणेशोत्सव मंडळांना दिल्या जाणाऱ्या विजेचा दर हा त्या दरापेक्षा कमी असून त्यामध्ये घरगुती वापराप्रमाणे स्लॅब नसून त्यांना हा दर ३ रुपये ७१ पैसे एवढाच ठेवला आहे.

Web Title: Damini's Watch on Ganesh Festival's Power Chart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.