Join us  

CoronaVirus News : मुंबईत कडक निर्बंध; सामान्यांचा लोकल प्रवास बंद होण्याची शक्यता, महापौरांची माहिती  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2021 10:58 PM

CoronaVirus News in Mumbai : दिवसा सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकार लवकरच नवीन नियमावली जाहीर करणार आहे. याबाबत महापौरांनी प्रसारमाध्यमांना गुरुवारी माहिती दिली. 

ठळक मुद्देमुंबईत दररोज पाच ते सहा हजार रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या आता ५० हजारांवर पोहोचली आहे.

मुंबई - कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने मुंबई सध्या डेंजर झोनमध्ये आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होत असल्याने त्यावर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. त्यामुळे शुक्रवारपासून कडक निर्बंध लावण्यात येतील, असा इशारा महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे. तसेच लोकलमधील प्रवाशांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी सर्वसामान्य दिलेली प्रवासाची परवानगी पुन्हा रद्द करण्यात येईल, असे संकेतही त्यांनी दिले आहेत. (CoronaVirus News: Strict restrictions in Mumbai; The possibility of stopping the local travel of the common people, the information of the mayor)  मुंबईत दररोज पाच ते सहा हजार रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या आता ५० हजारांवर पोहोचली आहे. चाचणीचे प्रमाण वाढविण्यात आले असल्याने रुग्णांची संख्याही येत्या काही दिवसांमध्ये दहा हजारपर्यंत पोहोचण्याची शक्यता आयुक्त इकबालसिंह चहल यांनीच वर्तविली आहे. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी मुंबईत सध्या रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे दिवसा सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकार लवकरच नवीन नियमावली जाहीर करणार आहे. याबाबत महापौरांनी प्रसारमाध्यमांना गुरुवारी माहिती दिली. 

(चिंताजनक! राज्यात कोरोनाचा कहर; दिवसभरात ४३ हजार १८३ नवे रुग्ण, २४९ जणांचा मृत्यू )

असे असतील कडक निर्बंध.... धार्मिक स्थळांच्या ठिकाणी वृद्ध, लहान मुले मोठ्या संख्येने जातात. त्यांना कोरोनाची लागण होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे धार्मिक स्थळे बंद केली जातील. हॉटेलमध्ये ५० टक्के उपस्थिती, चित्रपटगृह, मॉल बंद केले जातील. सामान्य प्रवाशांना लोकलमधील प्रवास बंद करुन अत्यावश्यक सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रवास करण्याची मुभा दिली जाईल, खाजगी कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थितीवर भर, दुकाने एक दिवस सोडून उघडली जातील, असे महापौरांनी सांगितले. 

खाटांची संख्या वाढविणार... ३१ मार्च रोजी तीन हजार ९०० खाटा उपलब्ध आहेत. ३२४ आयसीयू तर १७० व्हेंटिलेटर खाटा उपलब्ध आहेत. रुग्णसंख्या वाढत असल्याने धोका वाढत आहे. त्यासाठी १६ हजार खाटांची संख्या वाढवून २५ हजार खाटा उपलब्ध  करुन दिले जाणार आहेत. पालिकेची खाटा वाढवण्याची तयारी सुरु आहे. 

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकिशोरी पेडणेकर