Join us  

Coronavirus in Maharashtra : राज्यात अंशत: लॉकडाऊन? मॉल, सिनेमागृह, नाट्यगृहे बंद ठेवण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2021 7:10 AM

Partial lockdown in the Maharashtra : राज्यात संपूर्ण लॉकडाऊन केला जाणार नाही, असे सांगून एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, अर्थव्यवस्था चालू राहणे हे आजच्या काळात महत्त्वाचे आहे.

मुंबई : कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने राज्यात अंशत: लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय एक-दोन दिवसांत होऊ शकतो. त्यानुसार ज्या शहरांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे, त्या ठिकाणी मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह आणि खासगी आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.राज्यात संपूर्ण लॉकडाऊन केला जाणार नाही, असे सांगून एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, अर्थव्यवस्था चालू राहणे हे आजच्या काळात महत्त्वाचे आहे. संपूर्ण लॉकडाऊन केला तर गोरगरीब आणि मजुरांचे हाल होतील. त्यामुळे परिस्थितीनुरूप आणि त्या-त्या शहरांमधील रुग्णसंख्या पाहून निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. यातून मध्यममार्ग काय काढता येईल यासाठी मंत्रालयात अधिकाऱ्यांच्या, तर महाविकास आघाडीतील नेत्यांच्या ‘वर्षा’वर मुख्यमंत्र्यांसोबत बैठका सुरू आहेत. मुंबईत रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे, मुंबईची लाइफलाइन समजली जाणारी लोकल फक्त अत्यावश्यक सेवेसाठी व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. मुंबईसह ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे, त्या ठिकाणची हॉटेल्स बंद ठेवली जातील. मात्र हॉटेल्सना होम डिलिव्हरी किंवा ‘टेक अवे’ची परवानगी असेल. शॉपिंग मॉल्स १५ दिवसांसाठी बंद ठेवले जाऊ शकतात. खासगी आस्थापनांना ‘वर्क फॉर्म होम’ची सक्ती केली जाईल; मात्र प्रसिद्धीमाध्यमांना यामधून वगळण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.अन्य राज्यांमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण अत्यल्प आहे. आपल्याकडे तपासण्या मोठ्या प्रमाणावर होत आहेत. तपासण्या बंद करू नका, त्या आणखी वाढवा, असा आग्रह मुख्यमंत्री धरत आहेत. अन्य राज्यांत मात्र असे चित्र नसल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. मुंबईत दैनंदिन उच्चांक  कोरोनाचा कहर सुरु असून दैनंदिन रुग्णांची संख्या नवा विक्रम रचत आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेसह सामान्य मुंबईकरांच्या चिंतेतही भर पडली असून संसर्ग नियंत्रणाचे आव्हान कठीण होत चालले आहे. शहर उपनगरात गुरुवारी ८,६४६ रुग्णांची नोंद झाली असून १८ बळी गेले आहेत. बाधितांची संख्या ४ लाख २३ हजार ३६० झाली असून मृतांचा आकडा ११,७०४ झाला आहे.  २५ ते ३१ मार्चपर्यंत कोविड वाढीचा दर १.३८%  झोपडपट्ट्या व चाळींच्या वस्तीत सक्रिय कंटेनमेंट झोन्स ८० असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ६५० आहे. २४ तासांत रुग्णांच्या सहवासातील २७,०११ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेतला आहे.  

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई