Join us  

Coronavirus In Maharashtra: राज्यात गेल्या २४ तासांत १ हजार ७१५ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; २९ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 8:42 PM

राज्यात सध्या २८ हजार ६३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही आठवड्यांपासून मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १ हजार ७१५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर २९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिवसभरात २६८० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३९ टक्के आहे. राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के झाला आहे. 

राज्यात सध्या २८ हजार ६३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा ६५,९१,६९७ वर पोहोचला आहे. तर आजवर ६४,१९,६७८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत १ लाख ३९ हजार ७८९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,१०,२०,४६३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,९१,६९७ (१०.८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,२०,४७४ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ९६५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

दरम्यान, कोरोना विरुद्धच्या लढात मुंबईकरांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. उल्लेखनीय बाब अशी की मुंबईत २६ मार्च २०२० नंतर म्हणजेच गेल्या १८ महिन्यानंतर पहिल्यांदाच असं घडलं आहे. मुंबईच्या कोरोना विरुद्धच्या लढ्यातील एक देखील एक मोठं यश मानलं जात आहे. 

मुंबईत गेल्या २४ तासांत ३६७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ४१८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्ण बरं होण्याचं प्रमाण ९७ टक्क्यांवर पोहोचलं आहे. यासोबतच पॉझिटिव्हीटी दर १.२७ टक्क्यांवर आला आहे. विशेष म्हणजे १० ते १६ ऑक्टोबरमधील पॉझिटिव्हीटी दर केवळ ०.०६ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. शहरात सध्या ५,०३० सक्रीय रुग्ण आहेत. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्या