Join us  

Coronavirus : कोरोनामुळे परप्रांतीयांना गावाकडून आले बोलावणे, गाड्या हाउसफुल्ल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 4:06 AM

कोरोनाने निर्माण केलेल्या दहशतीमुळे काळजीपोटी गावाकडील कुटुंबीयांकडून त्यांना बोलावणे धाडले जात असून, भीतिपोटी तेसुद्धा ‘गड्या आपला गाव बरा’ म्हणत घरवापसी करू लागले आहेत.

मुंबई : पोटापाण्यासाठी मुंबई आणि सभोवतालच्या शहरांमध्ये दाखल झालेल्या अनेक परप्रांतीय बांधवांनी कोरोनाच्या भीतीमुळे आपल्या मूळ गावी परतण्यास सुरुवात केली आहे. बांधकाम प्रकल्पांवरील मजूर, कारागीर, हॉटेलांमध्ये काम करणारे वेटर, फेरीवाले आणि अन्य छोटी-मोठी कामे करणाऱ्यांचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे. काळजीपोटी गावाकडील कुटुंबीयांकडून त्यांना बोलावणे धाडले जात असून, भीतिपोटी तेसुद्धा ‘गड्या आपला गाव बरा’ म्हणत घरवापसी करू लागले आहेत.आमच्याकडे उत्तर प्रदेशातील काही कारागीर कामगार काम करतात. त्यापैकी काही जण तब्येत बरी नाही. आम्हाला गावी जायचे आहे, असे सांगत माझ्याकडे आले होते, परंतु अधिक चौकशी केली असता, कोरोनाच्या भीतीमुळे त्यांना आपापल्या घरी सुरक्षित वातावरणात जायचे असल्याचे समजले. गावाकडे असलेले त्यांचे कुटुंबीय मुंबईवरील कोरोनाच्या सावटामुळे अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे काहीही करा, पण घरी परत या, असा तगादा त्यांच्याकडून लावला जात असल्याची माहिती एका नामांकित बांधकाम कंपनीतील व्यवस्थापकाने दिली. हॉटेल व्यवसायातील ९० टक्के कर्मचारी हे परराज्यातून आलेले आहेत. वेटर आणि साफसफाईची कामे करणारी ही मंडळी हॉटेल मालकाने दिलेल्या स्टाफ क्वार्टर्समध्ये वास्तव्याला असतात.त्यांच्यात कोरोनाची प्रचंड दहशत निर्माण झालेली आहे. गावाकडून सातत्याने विचारपूस करून काळजी व्यक्त केली जात असल्याने त्यांची अस्वस्थता वाढत आहे. त्यामुळे त्यांना आपापल्या गावी परतण्याचे वेध लागले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शुक्रवारपासून हॉटेल बंद करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यामुळे घरी परतण्याचा कामगारांचा हट्ट वाढल्याची माहिती हॉटेल असोसिएशनचे सदस्य रत्नाकर शेट्टी यांनी दिली. जवळपास ५० टक्के कामगार आपल्या गावी परतण्याच्या तयारीत असल्याचेही सांगण्यात आले. जे कामगार गावी जात आहेत, त्यांना अर्ध्या महिन्यांचा पगार मालकांकडून दिला जात आहे. जे इथेच राहतील, त्यांना दोन वेळचे जेवण आणि सकाळचा नाश्ता देण्याची व्यवस्था आम्ही करणार असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले. कोरोनाच्या संकटामुळे व्यावसायिकांचे प्रचंड मोठे नुकसान होणार असल्याची भीती व्यक्त केली.कामगारांच्या परतीची चिंताकोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर जेव्हा व्यवहार पूर्वपदावर येतील, तेव्हा गावी गेलेल्या कामगारांना तातडीने पुन्हा बोलवणे अवघड जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लॉकडाउन जेव्हा उठेल, तेव्हा व्यवसाय पूर्ववत सुरू करताना अनेक अडचणी येतील, असे मत हॉटेल व्यावसायिकांकडून व्यक्त केले जात आहे.कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर जेव्हा व्यवहार पूर्वपदावर येतील, तेव्हा गावी गेलेल्या कामगारांना तातडीने पुन्हा बोलवणे अवघड जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लॉकडाउन जेव्हा उठेल, तेव्हा व्यवसाय पूर्ववत सुरू करताना अनेक अडचणी येतील, असे मत हॉटेल व्यावसायिकांकडून व्यक्त केले जात आहे.भाजीपाला ,फळबाजारातील गर्दी घटली, दर जैसे थेमुंबई : कोरोनामुळे ग्राहक घराबाहेर पडत नसून भाजीपाला आणि फळबाजारातील गर्दी घटली आहे. दरम्यान, भाजीपाला, फळे, दूधपुरवठा करणाºया गाड्यांची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे भाजीपाला, फळे यांच्या दरावर कोणताही परिणाम झाला नाही.दादर येथील भाजीविक्रेते ज्ञानेश्वर डोंगरे म्हणाले की, कोरोनामुळे ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दररोजच्या तुलनेत गर्दी खूप कमी झाली आहे. केवळ सकाळी १० ते ११ दरम्यान गर्दी असते, पण दिवसभर मात्र तुरळक ग्राहक येतात. सध्या भाजीपाल्याची आवक सुरू आहे, त्याच्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. जर पुरवठ्यामध्ये घट झाली, तर दरात वाढ होऊ शकते, असे ते म्हणाले. कोरोनामुळे दररोजच्या तुलनेत ५० टक्क्यांहून अधिक ग्राहकांची संख्या घटली आहे, असे फळविक्रेते नथुप्रसाद मौर्य यांनी सांगितले. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबईभारतीय रेल्वे