Join us  

CoronaVirus मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा १४ एप्रिलपर्यंत लांबणीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 8:05 PM

मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा २३ मार्चपासून तृतीय वर्ष बीकॉम सत्र ६ च्या परीक्षेने सुरू होत  होत्या.

मुंबई  : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्य शासनाने  दिलेल्या निर्देशानुसार मुंबई विद्यापीठाच्या सर्व लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा तसेच संलग्नित महाविद्यालयाच्या पदवीस्तरावरील प्रथम व द्वितीय वर्षाच्या सर्व लेखी व  प्रात्यक्षिक परीक्षा १४ एप्रिलपर्यंत लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत.१४ एप्रिलनंतर  राज्य शासनाच्या निर्देशानुसार व तत्कालीन परिस्थितीनुसार परीक्षेसंदर्भात पुढील निर्णय घेतला जाईल, असे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा २३ मार्चपासून तृतीय वर्ष बीकॉम सत्र ६ च्या परीक्षेने सुरू होत  होत्या.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून उच्च व तंत्रशिक्षण विभागाने १६ मार्च २०२० रोजी सर्व विद्यापिठांना पत्र पाठविले. यानुसार ३१ मार्च २०२० पर्यंत होणाऱ्या सर्व लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

तसेच २५ मार्च २०२० च्या महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार महाराष्ट्रातील टाळेबंदीचा (Lockdown) कालावधी १४ एप्रिल २०२० पर्यंत वाढविण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने उन्हाळी सत्राच्या सर्व लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा तसेच संलग्नित महाविद्यालयाच्या पदवीस्तरावरील प्रथम व द्वितीय वर्षाच्या सर्व लेखी व  प्रात्यक्षिक परीक्षा १४ एप्रिल २०२० पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

उन्हाळी सत्राच्या परीक्षेसंदर्भात१४ एप्रिलनंतर शासनाच्या निर्देशानुसार व तत्कालीन परीस्थिती पाहून पुढील निर्णय घेतला जाईल. तसेच  विद्यापीठ परीक्षेबाबत तसेच काही महाविद्यालयाचे  लेटरहेड मॉर्फ (Morph)  करून महाविद्यालयाच्या परीक्षेसंदर्भात चुकीचे संदेश समाजमाध्यमातुन फिरत आहेत. त्याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष देऊ नये.असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.  

यावर्षी उन्हाळी सत्रामध्ये विद्यापीठ चार विद्याशाखेमधून ७५० पेक्षजास्त परीक्षा घेत आहे.- २०२० च्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा  विद्याशाखा - परीक्षा संख्यामानव्य विद्याशाखा -९५वाणिज्य व व्यवस्थापन  विद्याशाखा- १०१विज्ञान व तंत्रज्ञान  विद्याशाख- ३८१आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा- १८२

एकूण परीक्षा ७५९

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा जरी पुढे गेल्या असतील तरी हे दिवस विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचे  असून या  कालावधीत  त्यांनी घरात बसून अभ्यास करावा, कुटुंबियांसोबत वेळ व्यतीत करावा, युट्युब व ऑनलाईनच्या  माध्यमातून अभ्यास करावा,अभ्यासाच्या  काही समस्या असतील  तर आपल्या शिक्षकांना समाजमाध्यमाच्या माध्यमातून संपर्क साधून त्या सोडवाव्यात तर काही वेळ आपला छंद जोपासावा. मिळालेल्या या बहुमूल्य वेळेचा आपण सदुपयोग करावा.

- डॉ. सुहास पेडणेकर, कुलगुरु, मुंबई विद्यापीठ

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई विद्यापीठपरीक्षा