Join us  

Coronavirus: थांबायचे नाही, लढायचे; कोरोनामुक्त झाल्यानंतरही महिला पोलिसाने दिला ११ बेवारस मृतदेहांना अग्नी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 6:54 AM

खाकीतील योद्ध्याचे आवाहन, या गंभीर परिस्थितीतही सर्वांना धीर देत, त्यांनी आत्मविश्वासाने कोरोनावर मात केली

मनीषा म्हात्रेमुंबई : कोरोनाच्या भीतीने नातेवाइक अंत्यविधीला जाण्यासाठी घाबरत असताना शाहूनगर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अंमलदार संध्या शिलवंत बेवारस मृतदेहांंना अग्नी देत आहेत. कर्तव्यादरम्यान त्यांनाही कोरोनाने गाठले. मात्र सकारात्मक विचारांनी त्यांनी कोरोनाला हरवले आणि पुन्हा कर्तव्यावर रुजू झाल्या. त्यानंतर आणखी ११ बेवारस मृतदेहांना अग्नी दिला. त्या सांगतात, थांबायचे नाही, तर लढायचे आहे.

विक्रोळीतील कन्नमवार नगर येथे पती, १३ वर्षांची मुलगी, ९ वर्षांचा मुलगा आणि सासू-सासरे यांच्यासोबत राहणाऱ्या संध्या या शाहूनगर पोलीस ठाण्यात एडीआर कारकून आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्यांनी एकाच दिवशी ४ बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. याची दखल घेत तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांचा सत्कार केला होता.

दरम्यान, ऑगस्टमध्ये त्यांच्या घरातही कोरोनाने शिरकाव केला. आधी पती, नंतर मुले, त्यापाठोपाठ संध्या यांना २० ऑगस्ट रोजी कोरोना झाला. मुलांना कोरोना झाल्यामुळे खाकीतील ही आई घाबरली. मात्र त्यानंतर औषधाेपचार, सकारात्मक विचारांनी कोराेनाला हरवायचे, असा निर्धार त्यांनी केला. सर्वांवर सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू होते. पुढे सासूलाही काेराेना झाल्याने  रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या गंभीर परिस्थितीतही सर्वांना धीर देत, त्यांनी आत्मविश्वासाने कोरोनावर मात केली. लवकरात लवकर कामावर हजर राहण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. महिनाभराच्या उपचारानंतर त्या कर्तव्यावर रुजू झाल्या. संध्या सांगतात, या काळात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावणे यांनी वेळोवेळी फोन करून चौकशी करत धीर दिला. सहायक पोलीस निरीक्षक किशोर झोटिंग यांनी तत्काळ बेड उपलब्ध करून दिल्यामुळे वेळेत उपचार सुरू झाले. त्यामुळे लवकर काेराेनामुक्त व्हायला मदत झाली.

मानसिकरित्या सक्षम राहाल, तरच कोरोनाला हरवू शकाल!कोरोनाला हरवल्यानंतर संध्या यांनी आतापर्यंत ११ बेवारस मृतदेहांना अग्नी दिला आहे. सध्याच्या काळात नागरिकांना कोरोनाला घाबरून चालणार नाही. मानसिकरित्या सक्षम राहिलात तरच कोरोनावर लवकरात लकवर मात करता येते. सकारात्मक विचार करणे सोडू नका. काेराेनासंदर्भात शासनाच्या नियमांचे पालन करून घरीच राहा, असे संध्या यांनी सांगितले.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यापोलिस