Join us  

Coronavirus: ‘केंद्र सरकारवर टीका करून पळ काढला जात असेल तर दुर्दैवी’; देवेंद्र फडणवीसांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 7:13 PM

ही अतिशय गंभीर घटना आहे. हे चित्र मनाला व्यथित करणारे आहे.

मुंबई – राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असतानाच दुसरं मोठं आव्हान राज्य सरकारसमोर उभं राहिले आहे. परराज्यातील हजारो कामगार यांनी रस्त्यावर उतरुन लॉकडाऊनची ऐशीतैशी केल्याचं चित्र मुंब्रा आणि वांद्रे परिसरात पाहायला मिळालं यावरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत.

याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बांद्य्रामध्ये हजारो मजूर रस्त्यावर उतरणे, ही अतिशय गंभीर घटना आहे. हे चित्र मनाला व्यथित करणारे आहे. परराज्यातील मजुरांची व्यवस्था करणे, त्यांना योग्य जेवण, सुविधा देणे, ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. तशी व्यवस्था होत नसल्याचे गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही निदर्शनास आणून देत आहोत. तरीही राज्य सरकारने तसे उपाय केलेले नाहीत असा आरोप त्यांनी केला.

तसेच आजच्या घटनेतून तरी राज्य सरकारने धडा घ्यायला हवा आणि यापुढे असे प्रकार होणार नाहीत, याची खबरदारी घ्यायला हवी. अशा स्थितीतही आपली जबाबदारी झटकून केंद्र सरकारवर टीका करून पळ काढला जात असेल तर ते आणखी दुर्दैवी आहे. कोरोनाविरूद्धचा लढा हा राजकीय नाही, हे कृपया आतातरी लक्षात घ्या. हा लढा आपल्याला गांभीर्यानेच लढावा लागेल, ही पुन्हा कळकळीची विनंती असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मुंब्रापाठोपाठ वांद्रे बस डेपो परिसरातील हजारोंच्या संख्येत रस्त्यावर जमाव उतरला होता. आम्हाला आमच्या मुळगावी जाऊ द्या अशी मागणी या मजुरांनी केली आहे. अखेर पोलिसांनी लाठीचार्ज करत परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश मिळवलं. पोलिसांनी लाठीचार्ज सुरु करताच जमाव पळू लागला. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे पण यावरुन राजकारण सुरु झालं आहे. मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावरुन केंद्र सरकारवर आरोप केला होता. ज्या दिवशी गाड्या बंद केल्या आहेत त्या दिवसापासून, प्रवासी कामगार घरी परत जावेत यासाठी राज्याने २४ तासासाठी गाड्या धावण्याची विनंती केली होती पण केंद्रान दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावरुन भाजपाने आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

ठाण्यातील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला कोरोनाची लागण; हॉस्पिटलमध्ये करणार दाखल

लॉकडाऊन वाढवल्याने मुंब्रा परिसरात तणाव; हजारोंच्या संख्येने जमाव रस्त्यावर उतरला

वांद्रे येथे लॉकडाऊनची ऐशीतैशी; हजारोंच्या संख्येने उतरलेल्या जमावामुळे परिसरात तणाव

१२ लाख कामगारांना दोन टप्प्यांत प्रत्येकी पाच हजार रुपये मिळणार; सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

सवलतींची होती अपेक्षा, पण पंतप्रधानांच्या 'त्या' घोषनेनं सगळ्यांनाच धक्का 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याउद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीस