Join us  

coronavirus: मुंबईतील सर्व विभागांमध्ये रुग्ण दुपटीचा कालावधी शंभरीपार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 2:51 AM

Mumbai Coronavirus News : सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. मालाड ते दहिसर या उत्तर मुंबई भागात रुग्णांची संख्या ४५ दिवसांमध्ये दुप्पट होत होती.

मुंबई : गणेशोत्सवानंतर मुंबईत वाढलेली रुग्णसंख्या आता पूर्णपणे नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. मुंबईतील सर्वच २४ प्रशासकीय विभागांतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी मंगळवारी शंभरीपार पोहोचला आहे. यापैकी सायन-वडाळा विभागात सर्वाधिक म्हणजे २९६ दिवसांनंतर रुग्णसंख्या दुप्पट होत आहे. तसेच मुंबईतील रुग्णवाढीचा दैनंदिन सरासरी दर अर्ध्या टक्क्यावर आला आहे.सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. मालाड ते दहिसर या उत्तर मुंबई भागात रुग्णांची संख्या ४५ दिवसांमध्ये दुप्पट होत होती. तसेच ७० टक्के रुग्ण इमारतींमधील रहिवासी असल्याचे आढळून येत होते. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी २५ ऑगस्ट रोजी ९३ दिवस इतका झाला होता. मात्र संसर्गाचे प्रमाण वाढल्याने हा कालावधी १४ सप्टेंबर रोजी ५४ दिवसांपर्यंत कमी झाला होता. यामुळे चिंता वाढली होती. मात्र १५ सप्टेंबरपासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत मुंबईतील घराघरात पालिकेच्या स्वयंसेवकांचे पथक पोहोचू लागले. ज्येष्ठ नागरिक, सहव्याधी असलेले व्यक्ती या सर्वांची तपासणी करून आवश्यकतेनुसार त्यांना उपचार उपलब्ध करून देण्यात आले. या मोहिमेचा प्रभाव दिसून येऊ लागला. २१ ऑक्टोबर रोजी रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी १०० दिवसांवर पोहोचला. तर मंगळवारपर्यंत मुंबईतील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी सरासरी १३९ दिवसांवर पोहोचला आहे.

लोकप्रतिनिधी आणि मुंबईकरांच्या सहकार्यामुळेच कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांना बळ मिळाले.  ‘मिशन झीरो’ हे आपले ध्येय असून ते गाठण्यासाठी मुंबईकरांचे सहकार्य महापालिकेला निश्चित मिळेल. - इक्बाल सिंह चहल, पालिका आयुक्त 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई