कोरोना लॉक डाऊन : मुंबई शहरात २९ हजार गरजूंना दोन वेळा जेवणाचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 16:39 IST2020-04-04T16:38:45+5:302020-04-04T16:39:35+5:30
२९ हजार गोरगरीब गरजू व्यक्तींना दोन वेळच्या जेवणाचे वाटप

कोरोना लॉक डाऊन : मुंबई शहरात २९ हजार गरजूंना दोन वेळा जेवणाचे वाटप
मुंबई : कोरोना पार्श्वभूमीवर सर्वत्र लाँकडाऊन असताना मुंबई शहर जिल्ह्यातील जवळपास २९ हजार गोरगरीब गरजू व्यक्तींना दोन वेळच्या जेवणाचे वाटप मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय आणि महानगरपालिका यांच्या संयुक्तपणे व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने केले आहे. मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी ही माहिती दिली आहे.
मुंबई शहरात पोटाची खळगी भरण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातील माणसं येतात. मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह भागवतात. मात्र सध्या लाँक डाऊनच्या काळात त्यांच्या हाताला काम मिळत नसल्याने उपासमार होत आहे. कामाचा पर्याय उपलब्ध नसल्याने त्यांना उपाशी राहू लागू नये याकरिता शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले असून सुमारे ११००० कामगार आणि १८००० गरजू व्यक्तींना दोन वेळचे अन्न वाटप केले जात आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील धारावी, माहीम, दादर, मुंबादेवी, वरळी, सायन कोळीवाडा, कुलाबा, मलबार हिल, शिवडी, मुंबादेवी आधी परिसरातील गरजूंना त्या भागातील सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक आणि प्रशासन यांच्या मदतीने दोन वेळेच्या जेवणाचे वाटप घरपोच केले जात आहे.