Join us  

मुंंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात पुन्हा एकदा मुलींनीच मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 3:40 AM

२६ नोव्हेंबरला समारंभ; ९०,३९३ विद्यार्थिनी तर ७७,८४६ विद्यार्थ्यांना बहाल होणार पदवी

मुंबई : गतवर्षीप्रमाणे मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात यंदाही मुलींचाच डंका वाजणार असून २६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या दीक्षान्त समारंभात ९०,३९३ विद्यार्थिनी तर ७७, ८४६ अशा एकूण १,६८,२३९ स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात येणार आहेत. यामध्ये पदवीसाठी १ लाख ३९ हजार ८३ तर पदव्युत्तरसाठी २९ हजार १५६ विद्यार्थ्यांना पदव्या देणार आहेत.विविध विद्याशाखांतील ४१३ स्नातकांना विद्यावाचस्पती (पीएच.डी.) आणि एम.फिल पदव्या प्रदान करण्यात येणार आहेत. विविध परीक्षांमध्ये प्रावीण्य संपादन केलेल्या १४ विद्यार्थ्यांना १९ पदके बहाल करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर २ पारितोषिके ही कुलपती पी. सी. अलेक्झांडर यांच्या नावे आणि एक कुलपती पदक बहाल करण्यात येईल.वार्षिक दीक्षान्त समारंभ २६ नोव्हेंबर, २०१९ रोजी विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर सभागृह, दीक्षान्त सभागृहात सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या दीक्षान्त समारंभाला प्रसिद्ध भारतीय वायु-अंतराळ शास्त्रज्ञ, अध्यक्ष संरक्षण संशोधन व विकास संस्था, सचिव रक्षा संशोधन व विकास विभाग (भारत सरकार), महानिदेशक, वैमानिक विकास एजन्सीचे डॉ. जी. सतीश रेड्डी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. तर दीक्षान्त समारंभाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी भूषवणार आहेत. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी आणि कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांची तसेच विविध विद्यालयांचे प्राचार्य व अन्य मान्यवरांचीदेखील यावेळी उपस्थिती असेल असे परीक्षा व मूल्यपामन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.प्राध्यापकांचाही सन्मानविद्याशाखानिहाय आकडेवारी लक्षात घेता या वर्षीच्या दीक्षान्त समारंभामध्ये मानव्यविज्ञान शाखेसाठी १९७८४, आंतरविद्याशाखेसाठी ८०३२, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेसाठी ८८४०२ आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी ५२०२१ पदव्यांचा समावेश आहे. तर प्रा. अविनाश बिनीवाले यांना डी.लीट आणि डॉ. नारखेडे यांना डी.एस्सी पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे.

टॅग्स :मुंबई विद्यापीठ