कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे ५ नगरसेवक शिवबंधनात
By Admin | Updated: February 17, 2015 00:19 IST2015-02-17T00:19:10+5:302015-02-17T00:19:10+5:30
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँगे्रस व राष्ट्रवादी काँगे्रसला सोमवारी मोठा धक्का बसला.

कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे ५ नगरसेवक शिवबंधनात
नवी मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँगे्रस व राष्ट्रवादी काँगे्रसला सोमवारी मोठा धक्का बसला. दोन्ही पक्षांचे पाच नगरसेवक व इतर महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवबंधन बांधून शिवसेनेमध्ये प्रवेश केला. लवकरच आणखी काही नगरसेवक सेनेत दाखल होणार असून यामुळे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर काँगे्रस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसह इतर पदाधिकाऱ्यांनी शिवसेना व भाजपमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी सिडको संचालक नामदेव भगत, त्यांचे समर्थक दिलीप आमले व इतरांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यानंतर सोमवारी राष्ट्रवादी काँगे्रसचे ज्येष्ठ नगरसेवक शिवराम पाटील, अनिता पाटील यांनी पक्षाचा व नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केला. काँगे्रसचे नगरसेवक रामाशेठ वाघमारे, रंगनाथ औटी, विलास भोईर, मागासवर्गीय सेलचे अंकुश सोनावणे व शिक्षण मंडळ सदस्य अरविंद नाईक, सचिन नाईक यांनीही पदाचे राजीनामे देऊन मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला.
काँगे्रसच्या इंदुमती भगत, सिंधू नाईक, हेमांगी सोनावणे या ३ नगरसेविका फक्त तांत्रिकदृष्ट्या पक्षात राहिल्या आहेत. येणाऱ्या काळात त्याही सेनेत प्रवेश करणार आहेत. बेलापूरचे नगरसेवक अमित पाटील हे नामदेव भगत यांचे नातेवाईक असल्यामुळे ते काय भूमिका घेणार याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. राष्ट्रवादी काँगे्रसचे वाशी, नेरूळ परिसरातील काही नगरसेवक भाजपमध्ये जाण्याची शक्यता असून पुढील काही दिवसांमध्ये पक्षात मोठी पडझड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी काँगे्रसने याविषयी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला आहे. शिवसेनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यास गती येईल या दृष्टिकोनातून भगवा हातात घेतला असल्याचे मत नगरसेवकांनी व्यक्ती केले आहे. (प्रतिनिधी)
काँगे्रसमधील गळती थांबेना : विधानसभा निवडणुकीनंतर काँगे्रसच्या जवळपास ३ नगरसेवकांनी पक्षांतर केले आहे. विद्यमान चार नगरसेवकांनी पक्षांतर केले आहे. येणाऱ्या काळात अजून ४ जण पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. यामुळे सद्यस्थितीमध्ये फक्त पाच नगरसेवक काँग्रेसमध्ये राहिले असून त्यापैकी चार नगरसेवकांना आरक्षणाचा फटका बसला आहे. पक्षाची गळती थांबत नाही. जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, पक्षाने सर्वकाही देऊनही स्वार्थासाठी अनेकांनी पक्ष सोडला. परंतु जनता त्यांना धडा शिकवेल.