रिक्षा बंदवरून संघटनांत मतभेद
By Admin | Updated: June 16, 2015 23:46 IST2015-06-16T23:46:53+5:302015-06-16T23:46:53+5:30
कामगार नेते शरद राव यांनी बुधवारी राज्यव्यापी रिक्षा बंदची हाक दिली आहे. नवी मुंबई रिक्षा महासंघाने बंदमध्ये सहभागी होण्याची घोषणा केली आहे.

रिक्षा बंदवरून संघटनांत मतभेद
नवी मुंबई : कामगार नेते शरद राव यांनी बुधवारी राज्यव्यापी रिक्षा बंदची हाक दिली आहे. नवी मुंबई रिक्षा महासंघाने बंदमध्ये सहभागी होण्याची घोषणा केली आहे. परंतु शिवसेनेसह इतर संघटनांनी प्रवाशांच्या हितासाठी बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यव्यापी रिक्षा बंद आंदोलनावरून नवी मुंबईमधील रिक्षा चालक - मालक संघटनांमध्ये एकवाक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महासंघाचे अध्यक्ष कासम मुलाणी यांनी बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी आरटीओ कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. परंतु या आंदोलनाला काही संघटनांनी विरोध दर्शविला आहे. रिक्षा चालकांच्या हितासाठी पाठपुरावा झाला पाहिजे. परंतु सेवा बंद करून प्रवाशांना वेठीस धरण्यास आमचा विरोध आहे. बंदमुळे रिक्षा चालकांचेही नुकसान होते. याशिवाय प्रवाशांच्या रोषासही सामोरे जावे लागते. यामुळे इतर मार्गांनी आंदोलन करण्यात यावे, अशी भूमिका मांडत शिवसेनाप्रणित महाराष्ट्र रिक्षा चालक सेना, रिक्षा चालक मालक सेवाभावी संस्था, नवी मुंबई रिक्षा चालक मालक संघटना, एसबी ग्रुप रिक्षा चालक संघटना यांनी बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.
रिक्षा संघटनांचे पदाधिकारी मनोहर गायखे, बंडू मोरे, दिलीप आमले, भरत नाईक व इतरांनी बंदमध्ये सहभागी न होण्याचे आवाहन रिक्षा चालकांना केले आहे. पोलिसांनाही पत्र देऊन रिक्षा चालकांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे. रिक्षा चालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सनदशीर मार्गाने लढा सुरू ठेवला जाणार असून त्यासाठी कोणालाही वेठीस धरले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)
नेत्यांनी आमरण
उपोषण करावे
बेमुदत रिक्षा बंद केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. रिक्षा चालकांचा व्यवसाय बुडतो. रिक्षा चालकांना रोषास सामोर जावे लागते. यामुळे रिक्षा चालकांच्या प्रश्नांसाठी नेत्यांनी आमरण उपोषण करावे. काळ्या फिती लावून किंवा साखळी उपोषण करून प्रश्नांकडे लक्ष वेधावे, अशी भूमिका एसबी ग्रुपच्या भरत नाईक यांनी मांडली आहे.