Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई महापालिका निकालानंतर भाजपा-शिंदेसेनेतील संघर्ष उफाळला; समाधान सरवणकरांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 15:27 IST

लोकसभा, विधानसभा आणि महापालिकाही हरलो त्यामुळे भाजपाने अशा पदाधिकाऱ्यांना बरखास्त केले पाहिजे अशी मागणी समाधान सरवणकर यांनी केली.

मुंबई - राज्यातील २९ महापालिकांचा निकाल लागल्यानंतर सगळीकडे सत्ता स्थापनेची गणिते जुळवली जात आहेत. त्यात मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालात महायुतीला लोकांनी कौल दिला. त्यात ८९ जागा जिंकून भाजपा सर्वात मोठा पक्ष बनला. मात्र बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपाला शिंदेसेनेच्या २९ नगरसेवकांची गरज भासणार आहे. त्यातच शिंदेंनी त्यांचे नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवल्याने विविध चर्चांना उधाण आले. मुंबईत महापौर पद शिंदेसेनेला हवे त्यामुळे हे हॉटेल पॉलिटिक्स सुरू झाल्याचं राजकीय वर्तुळात बोलले जाते. यातच माहिम-दादर येथील पराभवानंतर शिंदेसेनेचे उमेदवार समाधान सरवणकर यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. 

समाधान सरवणकर यांनी म्हटलं की, माझ्या प्रभागात ४-५ आमदार, २ पक्षप्रमुखांची मुले प्रचार करत होती तरीही माझे मतदार माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यात ५०० मतांनी माझा पराभव झाला. इतका दबाव असतानाही मतदार माझ्या पाठीशी ठाम उभे राहिले त्याचा आनंद आहे. माहिम मतदारसंघात सुरुवातीला भाजपाची मदत झाली. त्यानंतर भाजपाकडून कुठलीही मदत झाली नाही. काही विशिष्ट पदाधिकारी होते त्यांनी सरवणकरांना मदत करायची नाही असे संदेश पाठवले. व्हॉट्सअपवरून अनेकांना मेसेज दिले होते. हे मेसेज मीदेखील वाचले. महायुती कशी हरेल यासाठी भाजपाची टोळी सक्रीय होती. समोरून पैसे घेऊन भाजपाचे पदाधिकारी काम करत होते. त्यांच्याच पक्षातील उमेदवारांना पाडण्याचं काम भाजपा पदाधिकारी करत होते असा आरोप त्यांनी केला.

तसेच महायुती म्हणून माहिम विधानसभेत खूप चांगल्या प्रकारे काम होते. इथे जिंकण्याचे वातावरणही होते परंतु भाजपाच्या काही टोळीकडून पक्षाच्या विरोधात काम होते. भाजपाचा पदाधिकारी असल्याने खालच्या कार्यकर्त्यांना कदाचित ते सांगत असतील तो पक्षाचा आदेश वाटत होता. मात्र पक्षाचा आदेश नव्हता. मात्र भाजपा कार्यकर्त्यांची दिशाभूल करण्याचं काम काही टोळी माहिम विधानसभेत करत आहेत. याबाबत आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. ही टोळी मुख्यमंत्री असतील, आशिष शेलार असतील त्यांनाही एकेरी भाषेत, घाणेरडे शब्द वापरतात. लोकसभा, विधानसभा आणि महापालिकाही हरलो त्यामुळे भाजपाने अशा पदाधिकाऱ्यांना बरखास्त केले पाहिजे अशी मागणी समाधान सरवणकर यांनी केली.

दरम्यान, या टोळीकडे पक्षाचे लेबल असल्याने खालच्या कार्यकर्त्यांना आपण कुणाचे ऐकायचे हे कळत नाही. पक्षाकडून आदेश आलाय की हे स्वत:चे सांगतायेत हे कार्यकर्त्यांना कळत नाही. त्यामुळे या गोष्टी भाजपाला कळणे गरजेचे आहे. भाजपाचं नाव खराब करण्याचं काम ही टोळी करत आहे. वार्ड १९१, १९२ सगळीकडे तेच झाले. काही पदाधिकाऱ्यांनी काम करणे बंद केले. शेवटचे २ दिवस भाजपा पदाधिकारी प्रचारात दिसणे बंद झाले असंही समाधान सरवणकर यांनी म्हटलं.  

English
हिंदी सारांश
Web Title : BJP-Shinde Sena Clash Erupts After Mumbai Municipal Corporation Results: Serious Allegations

Web Summary : Post Mumbai civic polls, tensions rise between BJP and Shinde Sena. Sarvankar alleges BJP sabotage in his defeat, accusing party members of working against alliance candidates and misleading workers. He plans to meet Fadnavis regarding this.
टॅग्स :महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक निकाल २०२६महाराष्ट्र निवडणूक निकाल २०२६