CM Devendra Fadnavis News: मुंब्रा येथे घडलेली घटना गंभीर आहे. काही माध्यमांमध्ये मी पाहात होतो की, रेल्वेमंत्री असंवेदनशील आहेत, असे सांगत होते. मूळात रेल्वेमंत्री माझ्याशी पाऊण तास चर्चा करत होते. त्यातल्या अडचणी काय आहेत, हेही त्यांनी समजावून सांगितले, उपाययोजना काय आहेत, हेही त्यांनी सांगितले. आपण पाहिले, तर उपनगरीय रेल्वेवरही सर्वांत जास्त गुंतवणूक ही मोदी सरकारच्या काळात झालेली आहे. प्रवाशांच्या सोयी-सुविधेत, प्रवासी सुरक्षितता यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते पत्रकारांशी बोलत होते.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईतील मेट्रोचे नेटवर्क पूर्ण न झाल्यामुळे मुंबईतील उपनगरीय लोकलमध्ये सर्वाधिक गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे अतिरिक्त ट्रेन कशा आणता येतील, हाही एक प्रश्न आहे. तसेच त्यांनी सांगितले की, आम्ही दरवाजे लावण्याचा विचार करत आहोत. त्यावर लगेचच दरवाजे लावले, तर लोक गुदमरतील, अशी ओरड सुरू झाली. पण एवढे सरकारला समजते. डिझाइन करताना अनेक बाबी लक्षात घेतल्या जातात. दरवाजे लावले तर व्हेंटिलेशनची सोय करावी लागेल. व्हेंटिलेशनची सोय न करता सरकार दरवाजे लावणार नाही. डिझाइन करण्याचे डोके निश्चितपणे सरकारकडे आहे, असा खोचक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.
मोठ्या प्रमाणात आपल्याकडे एसी ट्रेन द्यायच्या
एवढेच नाही, तर त्यांचा प्रयत्न आहे की, मोठ्या प्रमाणात आपल्याकडे एसी ट्रेन द्यायच्या. एसी ट्रेन देताना भाडेवाढ न करता, या एसी ट्रेन कशा देता येतील, याचा प्लान केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी तयार केलेला आहे. मुंब्रा येथे जी घटना घडली आहे, त्यातून आपल्याला निश्चितपणे काही गोष्टी शिकाव्या लागतील. त्याप्रमाणे काम करावे लागेल, त्याचे प्लानिंग केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून करेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, आपल्याकडील मेट्रो या अतिशय चांगल्या आणि एसी आहेत. परंतु, लोकल ट्रेनने प्रवास करणारा नागरिक दुय्यम नाही. त्यामुळे त्यालाही एसी मिळावी आणि त्याच फेअरमध्ये मिळावी, असा आमचा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.