Join us

“हिंदू ग्रोथ रेट जगाला दिशा देईल, २०२८ पर्यंत ५ ट्रिलियनचा टप्पा गाठू”; CM फडणवीसांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 13:26 IST

CM Devendra Fadnavis WHEF 2024 Mumbai News: २०३० पर्यंत ७ ट्रिलियनपर्यंत भारत जाऊ शकेल. जग आशेने भारताकडे पाहात असून, महाराष्ट्र देशाचा कणा बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

CM Devendra Fadnavis WHEF 2024 Mumbai News: येत्या काळात मुंबई फिनटेकची राजधानी बनणार आहे. हिंदू आर्थिक परिषदेच्या आधारे विकास कसा करु शकतो. यासंदर्भात अनेक गोष्टी पुढे आल्या आहेत. परदेशातील सभ्यता आणि आपल्यात मूळात अंतर आहे. तिथे जो ताकदवान असेल तो जिंकेल. मात्र, आपल्याकडे समाज कमकुवत माणसाची मदत करुन समोरच्याला जगायला लावेल, ही आपली संस्कृती आहे. जगातील मोठ्या अर्थाव्यवस्था बघितल्या तर शोषण दिसते. आपण कोणाला लुटले नाही. ज्या राजाने दिले, त्याला आपण मोठे मानले. दुसऱ्याचे घेणाऱ्याला मोठे मानले नाही. देशातील स्वातंत्र्यानंतर परिस्थिती बघितली तर १९९० च्या दशकात आपली थट्टा उडवली जायची. पण हिंदू ग्रोथ रेट जगाला दिशा देईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

जागतिक हिंदू आर्थिक परिषद मुंबईत भरली होती. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. आपण तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेकडे जात आहोत. आपली जनसंख्या मोठी आहे. त्यामुळे आपण विकसित होऊ शकत नाही, असे बोलले जायचे. मात्र त्याच गोष्टीला आपण माध्यम, साधन म्हणून वापरले. विकसित होऊ शकतो, याचे उदाहरण जगाला घालून दिले. माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयींनी याचा पाया रचला आहे. त्याचा वटवृक्ष करण्याचे काम आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. भारत मोठ्या प्रमाणात पुढे जात आहे. जगातील अर्थ व्यवस्था बघता आपण विचार करतो की, भांडवलशाहीमुळे गरीबी आणि श्रीमंतातील दरी वाढत आहे. परंतु, २५ कोटी लोकांना आपण गरिबीतून बाहेर काढले आहे. हेच हिंदू अर्थव्यवस्थेचे मॉडेल आहे. २०२८ पर्यंत आपण ५ ट्रिलियनचा टप्पा गाठू. २०३० पर्यंत ७ ट्रिलियनपर्यंत जाऊ, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

सगळ्यात पहिली एक ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी महाराष्ट्र बनेल

आम्ही प्रयत्न करत आहोत. सगळ्यात पहिली एक ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी महाराष्ट्र बनेल. अर्धा टप्पा आम्ही मागच्या वर्षीच पार केला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. ग्लोबल सप्लाय चेनमध्ये आपण एक महत्त्वाचा हिस्सा बनू शकतो. लॉजिस्टिक्स महत्त्वाचे आहे, त्या उद्देशाने आम्ही राज्यात प्रयत्न केले. हायस्पीड हायवे आम्ही तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत. समृद्धी महामार्ग १६ जिल्ह्यांना जोडतो तसेच बंदरांनाही जोडतो. भारताचा कंटेनर ट्रॅफिक ६० टक्के जेएनपीटी घेते. मात्र, वाढवण बंदराच्या माध्यमातून आम्ही दुसरा पर्याय उभा करत आहोत. वाढवण हे जेएनपीटीच्या चौपट आहे. त्यामुळे मोठा फायदा होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्र देशाचा कणा बनेल

ग्रीन एनर्जीच्या आधारे विकास करण्याचा प्रयत्न करणार आहोत. भारताच्या विकासाची यात्रा वेगाने सुरु आहे. शाश्वत विचार आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. आर्थिक सामाजिक आणि संस्कृती निर्माण आपल्याला करायचा आहे. जग भारताकडे बघते आहे. महाराष्ट्र देशाचा कणा बनेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

दरम्यान, भाजपाचे सरकार राज्यात आल्यानंतर आम्ही २०१४ पासून मोठे बदल केले. जवळपास ४९ टक्के इन्फ्रा प्रकल्प महाराष्ट्रात सुरु आहेत. सिलिंक, कोस्टल रोड आणि इन्फ्रामध्ये मोठी गुंतवणूक केलेली आहे. डिजिटल इकॉनॉमीकडे जाताना आम्ही महाराष्ट्राला डेटा कॅपिटल म्हणून पाहत आहोत. डिटिजल  इकॉनॉमी आणि एआयला आपल्याला स्वीकारायला हवे. आपण तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. अर्थव्यवस्थेला त्या आधारेच आपण पुढे घेऊन जाऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसअर्थव्यवस्था