कमी पटसंख्येच्या ५८० शाळा बंद, वाचणार शेकडो कोटी
By Admin | Updated: August 24, 2015 23:30 IST2015-08-24T23:30:36+5:302015-08-24T23:30:36+5:30
कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. यामुळे ठाणे व पालघर जिल्ह्यांतील कमी पटसंख्येच्या ५८० प्राथमिक व माध्यमिक शाळा बंद होणार

कमी पटसंख्येच्या ५८० शाळा बंद, वाचणार शेकडो कोटी
- सुरेश लोखंडे, ठाणे
कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. यामुळे ठाणे व पालघर जिल्ह्यांतील कमी पटसंख्येच्या ५८० प्राथमिक व माध्यमिक शाळा बंद होणार असून शेकडो कोटी रुपयांची उधळपट्टी थांबणार आहे.
यासंदर्भात लोकमतने याबाबतची वृत्ते वेळोवेळी प्रसिद्ध करून सरकारला जाग आणली होती. यामुळे अनेक पुढऱ्यांच्या बगलबच्चांना सोयीच्या ठिकाणी ठाण मांडून बसणे कठीण होणार असल्याने ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी मंत्रालयात धाव घेतली.
लोकमतने ७ आॅगस्टला ‘कमी पटसंख्येच्या शाळा बंद कधी? या मथळ्यासह आणि ‘वारे वा कारभार ! विद्यार्थी १० शिक्षक २’ या मथळ्याखाली ११ आॅगस्टला वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याचीच परिणती म्हणजे हा शासकीय निर्णय आहे. संपूर्ण राज्यातील बंद होणाऱ्या शाळांमुळे राज्य शासनाची सहा हजार कोटींची बचत होणार आहे. तर ठाणे आणि पालघर या दोन जिल्ह्यांतील ही बचत शेकडो कोटींच्या घरात आहे.
आधीच्या सरकारने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल विभागाव्दारे शाळांमधील विद्यार्थी पटसंख्येचे सर्वेक्षण करून कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचे आदेशही काढले होते.
विभाजनानंतर ठाणे जिल्ह्यात जि.प.च्या सुमारे १७०० शाळा शिल्लक राहिल्या असता त्यातील सुमारे ३१६ शाळा बंद होण्यास पात्र ठरल्या होत्या. पालघर जिल्ह्याच्या आदिवासी, दुर्गम भागात सुमारे १८५५ शाळा आहेत. यापैकी २६४ शाळांची पटसंख्या कमी असल्याचे आढळून आले आहे.
या शैक्षणिक वर्षातदेखील सुमारे ३९० शाळा आढळून आल्या आहेत. पण, त्या बंद करण्याच्या दृष्टीने ठाणे जिल्हा परिषद प्रशासनासह महापालिकांकडूनही कारवाई केली जात नव्हती.
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ या तालुक्यांतील सर्वाधिक शाळांचा समावेश आहे. तर, पालघरच्या जव्हार, तलासरी, वाडा, मोखाडा, विक्रमगड, डहाणू तालुक्यांच्या दुर्गम भागातील शाळा विद्यार्थी पटसंख्येअभावी बंद होणार आहे.