चौल - रेवदंडा पर्यटनस्थळे विकासापासून वंचित
By Admin | Updated: May 16, 2015 22:49 IST2015-05-16T22:49:08+5:302015-05-16T22:49:08+5:30
रायगड जिल्हा पर्यटन समृध्द आहे. इथे किल्ले, गड, थंड हवेची ठिकाणे, अभयारण्य, लेण्या कमी नाहीत.

चौल - रेवदंडा पर्यटनस्थळे विकासापासून वंचित
अभय आपटे ल्ल रेवदंडा
रायगड जिल्हा पर्यटन समृध्द आहे. इथे किल्ले, गड, थंड हवेची ठिकाणे, अभयारण्य, लेण्या कमी नाहीत. अलिबाग शहरापासून सुमारे सोळा किमी अंतरावर दक्षिण टोकाला चौल - रेवदंडा नारळी पोफळीच्या डौलदार बागा आणि शांत, सुरक्षित असलेला किनारा ही प्राचीन नगरे पर्यटनस्थळे म्हणून आजही विकासापासून वंचित आहेत.
अलीकडे धकाधकीच्या जीवनात सर्वसामान्य माणूससुध्दा खिशाला परवडेल अशा स्थळांच्या शोधात असतो. प्रगत दळणवळणाच्या सहाय्याने एखाद्या महत्त्वाच्या पर्यटनस्थळाला भेट देऊन रात्री परत घरी जाता येईल, अशा ठिकाणाच्या शोधात पर्यटक असतात. अनेकांना तर फक्त निवांतपणा हवा असतो, त्यांच्यासाठी चौल - रेवदंडा ही स्थळे परवडणारी असली तरी सुविधांची स्थिती बिकट असल्याने मुरुडसारख्या प्रतिगोवा मानल्या गेलेल्या काशिद बीचवर जाणाऱ्या पर्यटकांचा ओघ येथे थांबू शकत नाही, ही एक शोकांतिका आहे.
अलिबागवरून मुरुडकडे जाताना लागणारी ही प्राचीन नगरे अरुंद रस्ते, वेडीवाकडी वळणे आणि खड्डेमय रस्त्यांच्या प्रवासामुळे पर्यटकांच्या पसंतीस उतरली नाहीत. उत्तम प्रतिची उपाहारगृहे नाहीत, वाहनतळ नाही, त्यामुळे पर्यटक येथे थांबणेही पसंत करत नाहीत. येथील किनारा शांत व सुरक्षित आहे, एकही पर्यटक या किनाऱ्यावर येऊन अपघात झाला असे चित्र नाही, तरीसुध्दा पर्यटक या किनाऱ्याकडे पाठ फिरवल्यासारखे वाटतात, हे चित्र स्पष्ट जाणवते.
अनेक वर्षे ग्रामपंचायतीमार्फत पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रस्त्यांचे क्राँक्रिटीकरण, विद्युत व्यवस्था अशा सोयी करणे चालू असून सुलभ शौचालयाची उभारणी गतवर्षी करण्यात आली असली तरीही व्यवसायवृद्धी झाली नाही.