Join us  

हिंदुत्वाची आठवण करुन देणाऱ्या राज्यपालांना मुख्यमंत्र्यांचे ठाकरी शैलीत खरमरीत पत्र

By महेश गलांडे | Published: October 13, 2020 1:28 PM

मंदिर बंद, उघडले बार, उद्धवा, धुंद तुझे सरकार.. अशा प्रकारचा नारा देत राज्यातील मंदिरे भक्तांसाठी खुली करावीत, या मागणीसाठी भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने राज्यभरात आंदोलने केली जात आहेत.

ठळक मुद्देआपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही.

मुंबई - देशात अचानक लॉकडाऊन लादणे योग्य नव्हते. त्यामुळेच, एकदम ते पूर्णपणे रद्द करणेही उचित ठरणार नाही, असे म्हणत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राज्यातील मंदिरे खुली करण्याच्या मागणीला एकप्रकारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तुर्तास नकार दर्शवला आहे. त्यासोबतच, राज्यपालांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला होता, त्यावरही मुख्यमंत्र्यांनी जशात तसे उत्तर दिलंय. त्यामुळे, राज्यात राज्यपाल विरुद्ध सरकार असा वाद पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. 

मंदिर बंद, उघडले बार, उद्धवा, धुंद तुझे सरकार.. अशा प्रकारचा नारा देत राज्यातील मंदिरे भक्तांसाठी खुली करावीत, या मागणीसाठी भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने राज्यभरात आंदोलने केली जात आहेत. मुंबईतील सिद्धीविनायक मंदिराबाहेरही भाजपा नेते व कार्यकर्त्यांनी आरती करुन मंदिरं उघडण्याची मागणी केली. त्यातच, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मंदिरे उघडण्याची सूचना दिली आहे. तसेच, आपण हिंदुंचे कट्टर पुरस्कर्ते आहात, मुख्यमंत्री झाल्यानंतर आपण अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामांचे दर्शनही घेतले. आषाढी एकादशीला पंढरीला जाऊन विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पुजाही केली. मात्र, राज्यात मंदिरे खुली करण्याबाबतची आपली भूमिका पाहिल्यानंतर आश्चर्य वाटते. आपण, अचानक सेक्युलर तर झाले नाहीत ना? असा सवालही कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना जशास तसे उत्तर दिलंय.  

महोदय, आपले दिनांक १२।१०।२० रोजीचे इंग्रजीमध्ये पाठवलेले प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दलचे पत्र मिळाले. याबद्दल सरकार जरूर विचार करत आहे. जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे, आणि म्हणूनच करोनाशी लढताना जसा एकदम लॅाकडाऊन करणे चुकीचे तसेच तो एकदम उठवणेही अयोग्यच. कोरोनासोबत अथवा त्याचा धोका टाळून जगणे हे अंगवळणी पडावे म्हणून सद्ध्या राज्यात ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी ‘ हि मोहीम राबवली जात असल्याची आठवण उद्धव ठाकरेंनी पत्रातून करुन दिलीय. 

महोदय, आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणाऱ्याचें हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही. Have you suddenly turned ‘Secular’ yourselves, the term you hated? असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे Secular असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ  ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा ‘Secularism’ आहे तो आपल्याला मान्य नाही का?  मला या संकटाशी लढताना काही divine premonition येतात का? असाही प्रश्न आपणांस पडला आहे, आपल्याला अशा गोष्टींचा अनुभव असेल. मात्र, मी एवढा थोर नाही . इतर राज्यांत, देशात बरे वाईट काय घडते आहे ते बघत माझ्या महाराष्ट्रात चांगले कसे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना खरमरीत पत्र लिहिलं आहे. 

दरम्यान, आपण म्हणतां गेल्या ३ महिन्यात काही शिष्टमंडळांनी भेटून आपल्याला प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दल विनंती केली, त्यातील ३ पत्रे आपण सोबत जोडली आहेत. हि तिनही पत्रे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि समर्थकांची आहेत. हा योगायोग असू शकतो. असो आपल्या विनंतीचा महाराष्ट्र सरकार गांभिर्याने विचार करत असून सर्व काळजी घेवून लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल हि खात्री मी आपल्याला देतो, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले. 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाकोरोना वायरस बातम्यामंदिरमुंबईभगत सिंह कोश्यारी