लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बेस्ट बसच्या अपघातांमुळे सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला असताना बेस्ट ही महापालिकेची जबाबदारी नाही, अशी भूमिका घेऊन आयुक्तांनी एकप्रकारे या उपक्रमाला वाळीत टाकले आहे. त्यामुळे हा उपक्रम वाचवण्यासाठी बेस्ट कामगार सेनेने आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे.
बेस्ट उपक्रम नेहमीच जनतेला दर्जेदार परिवहन सेवा देत आला आहे. मात्र, अलीकडे खासगीकरणामुळे बेस्टला घरघर लागली असून त्या धोरणामुळे त्याच्या बस अपघातांचे प्रमाणही वाढले आहेत. त्यातच कुर्ला येथील अपघातामुळे उपक्रमाची प्रतिमा आणखी खराब झाली आहे. या पार्श्वभूमीवर उपक्रमात तातडीने सुधारणा करणे गरजेचे असून यासंदर्भात तातडीने पालिका आयुक्त, बेस्टचे महाव्यवस्थापक यांच्या उपस्थितीत बैठक घ्यावी. त्यात आमच्या संघटनेचे पदाधिकारीही सहभागी होतील. उपक्रमात सुधारणा होण्यासाठी आवश्यक ते सहकार्य संघटनेकडून केले जाईल, असे संघटनेने निवेदनात म्हटले आहे.