इराणी टोळ्यांचा धुमाकूळ रोखण्याचे आव्हान
By Admin | Updated: May 30, 2014 00:33 IST2014-05-30T00:33:01+5:302014-05-30T00:33:01+5:30
मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात इराणी टोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे.

इराणी टोळ्यांचा धुमाकूळ रोखण्याचे आव्हान
नामदेव मोरे, नवी मुंबई - मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात इराणी टोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. सोनसाखळी चोरीसह, तोतया पोलिस बनून नागरिकांना लुटले जात आहे. चोरी हाच व्यवसाय असल्यामुळे काहीजण चोरी करण्यासाठी दिल्लीसह इतर राज्यांतही प्रवास करीत आहेत. नवी मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट १ ने इराणी टोळीतील ५ आरोपींना नुकतेच अटक केली आहे. या आरोपींकडून तब्बल पाव किलो वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. आतापर्यंत सर्वात मोठी कारवाई म्हणून याकडे पाहिले जात आहे. या कारवाईमुळे इराणी टोळ्यांचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. डोंबिवली, मुंब्रा व भिवंडी परिसरात वास्तव्यास असणार्या इराणी समुदायातील काहीजणांसाठी चोरी हाच व्यवसाय बनला आहे. धूम स्टाईल मोटारसायकल चालवून महिलांच्या गळ्यातील दागिने खेचायचे. कमी रहदारी असणार्या रस्त्यावर उभे राहून पोलिस असल्याचे सांगून महिलांचे दागिने लांबविण्यात येत आहेत. बँकेत पैसे मोजून देण्याच्या बहाण्यानेही अनेकजण चोरी करीत आहेत. बोलण्यामध्ये समोरच्या व्यक्तीला गुंगवून त्यांची दिशाभूल करण्यात या चोरट्यांचा हात कोणीच धरू शकत नाही. इराणी टोळ्यांनी मुंबई, ठाणे,नवी मुंबई परिसरात धुमाकूळ घातलाच आहे. परंतु त्यांनी आता कार्यक्षेत्र वाढविले आहे. राज्यातच नव्हे तर देशाची राजधानी दिल्लीत जावूनही काहींनी चोरी केल्याचे बोलले जात आहे. येथून विमानाने दिल्ली, हरियाणा व इतर राज्यात काहीजण जातात. तेथे ८ ते १० ठिकाणी चोरी करायची व पुन्हा मुंबई गाठायची अशी कार्यशैली काहींनी अवलंबली असल्याचे निदर्शनास आल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी सांगितले. कायद्यातील पळवाटांमुळे या टोळ्यांवर कडक कारवाई होत नाही. आरोपी पकडले की त्यांना १ ते ३ महिन्यात जामीन मिळतो. अनेक गुन्हे सिद्ध होतच नाहीत. सिद्ध झाले तरी १ ते दीड वर्षांपेक्षा मोठी शिक्षा होत नाही. याचमुळे या टोळ्यांच्या कारवाया थांबतच नाहीत.