मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक
By Admin | Updated: February 7, 2015 23:06 IST2015-02-07T23:06:09+5:302015-02-07T23:06:09+5:30
मुलुंड-माटुंगा मार्गावरील अप धीम्या दिशेसह हार्बरच्या पनवेल-नेरूळ स्थानकांदरम्यान दोन्ही दिशांवर मध्य रेल्वे रविवारी मेगाब्लॉक घेणार आहे.

मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक
डोंबिवली : मुलुंड-माटुंगा मार्गावरील अप धीम्या दिशेसह हार्बरच्या पनवेल-नेरूळ स्थानकांदरम्यान दोन्ही दिशांवर मध्य रेल्वे रविवारी मेगाब्लॉक घेणार आहे. हे ब्लॉक अनुक्रमे स. ११.१५ ते दु. ३.१५ आणि स. ११ ते दु. ३ या कालावधीत आहेत.
या ब्लॉकमुळे मुलुंड-माटुंगा स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरील वाहतूक अप जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. असे असले तरीही या मार्गावर ज्या स्थानकांत फलाट आहेत, त्या सर्व ठिकाणी ब्लॉकच्या कालावधीत लोकल थांबणार असल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केले आहे. त्यामुळे नाहूर-कांजुरमार्ग आणि विद्याविहार स्थानकांत या कालावधीत लोकल उपलब्ध नसतील. त्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी त्यांना आहे त्याच तिकीट/पासावर भांडुप अथवा कुर्ला स्थानकांतून प्रवासाची मुभा देण्यात आल्याचे जनसंपर्क विभागाने जाहीर केले आहे.
हार्बर मार्गावरील पनवेल-नेरूळ अप/डाऊन स्थानकांदरम्यान दोन्ही दिशांवर ब्लॉक असल्याने या कालावधीत सीएसटीहून डाऊनमार्गे तर पनवेल/बेलापूर/वाशी येथून अपमार्गे लोकल पनवेल-नेरूळ स्थानकांदरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल-अंधेरी/बांद्रा मार्गावरील वाहतूक या ब्लॉकच्या कालावधीत दोन्ही दिशांवर रद्द करण्यात येणार आहे. ट्रान्स-हार्बर मार्गावर ठाणे-नेरूळ आणि सीएसटी-नेरूळ मार्गांवर विशेष लोकल सोडण्यात येतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
ठाण्याच्या नवीन रेल्वे स्थानकाला चालना
ठाणे ते मुलुंडदरम्यान नवीन रेल्वे स्थानक उभारण्याच्या कामाला राज्य शासनाने मंजुरी दिली असून हा प्रस्ताव आता केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती खासदार राजन विचारे यांनी दिली. ९ जानेवारी २०१५ रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू ठाण्यात आले असताना रेल्वेचे अधिकारी तसेच ठाण्यातील लोकप्रतिनिधींसोबत झालेल्या चर्चेच्या वेळी नवीन रेल्वे स्थानकाबाबत रेल्वेमंत्र्यांनी अनुकूलता दाखवून या प्रकल्पासाठी रेल्वे मंत्रालयाकडून हिरवा कंदील दाखविण्यात आला होता. राज्य सरकारनेदेखील मनोरु ग्णालयाच्या काही जागेवर नवीन स्थानक बांधून देण्यास अनुकूलता दर्शविली. राज्याचे अप्पर मुख्य सचिव (परिवहन व बंदरे) विभागाचे गौतम चॅटर्जी यांनी पत्र लिहून राज्य सरकारतर्फे नवीन रेल्वे स्थानक उभारण्याचा प्रस्ताव अंतिम करून केंद्र शासनाची मंजुरी घेण्याकरिता मध्य रेल्वे प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे.