केंद्राकडून विकासकामांत अडथळे आणणे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:24 IST2021-02-05T04:24:34+5:302021-02-05T04:24:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : तंगड्यात तंगडे अडकवून अडथळ्यांची शर्यत निर्माण करायची आणि विकासकामांची गती मोजायची असा खेळ राज्यातील ...

केंद्राकडून विकासकामांत अडथळे आणणे सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : तंगड्यात तंगडे अडकवून अडथळ्यांची शर्यत निर्माण करायची आणि विकासकामांची गती मोजायची असा खेळ राज्यातील महाविकास आघाडी सरकारबाबत खेळला जात असल्याचा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार व भाजपला सोमवारी लगावला. केंद्राकडे राज्याचे अनेक प्रकल्प रखडलेले आहेत. त्यात अडथळे निर्माण करून महाराष्ट्रात विकासकामे होत नसल्याची टीका भाजपचे नेते करीत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. कल्याणमधील बहुचर्चित नव्या पत्रीपुलाचे ऑनलाइन लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.
त्या वेळी ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जनतेशी संवाद साधला. पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, भाजप खासदार कपिल पाटील, शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर, भाजप आमदार रवींद्र चव्हाण, गणपत गायकवाड, मनसे आमदार राजू पाटील, राज्य रस्ते विकास महामंडळाचे संचालक राधेश्याम मोपलवार, माजी महापौर विनिता राणे, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
मागच्या सरकारच्या काळात कामे होत होती. आताचे सरकार काय करीत आहे, असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात असला तरी मागचे सरकार हे ‘बोलाचाच भात आणि बोलाची कढी’ होते. पत्रीपुलाचे काम पूर्णत्वास आल्याने महाविकास आघाडी सरकारने ‘करून दाखविले’, अशा शब्दांत ठाकरे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. पत्रीपुलाचे लोकार्पण होताच आदित्य ठाकरे यांची पहिली गाडी पुलावरून पास झाली. तेव्हा सगळ्यांनी एकच जल्लोष केला.
पत्रीपुलाच्या नावावरून वाद, चर्चा
कल्याण : कल्याणचा जुना पत्रीपूल ब्रिटिशकालीन होता. त्याचे नाव ‘तिसाई देवी पूल’ हेच असून ते बदलले जाणार नाही, असा दावा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुलाच्या उद्घाटन प्रसंगी केला.
पुलास माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे नाव द्यावे, अशी मागणी भाजप आ. रवींद्र चव्हाण यांनी केली आहे. खा. कपिल पाटील यांनी कार्यक्रमात त्याचा पुनरुच्चार केला. मात्र, खा. शिंदे यांनी पुलाचे नाव ‘तिसाई देवी पूल’ आहे व राहील, असे स्पष्ट केले. मात्र पुलाच्या नामकरणावरून नव्या वादाला तोंड फुटू नये याकरिता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकभावनेचा आदर केला जाईल, असे कार्यक्रमात स्पष्ट केले. मुख्यमंत्री ठाकरे यांनीही नामकरणाच्या वादाचा समाचार घेतला. दुसऱ्याला नावे ठेवणे हे सोपे असते. मात्र काम करून दाखवणे अवघड असते. आपले नाव दिले जाईल, असे काम तुमच्याकडून झाले पाहिजे. कलामांविषयी मला प्रचंड आदर आहे, असे ठाकरे म्हणाले.
दरम्यान, या पुलास माजी कामगारमंत्री व शिवभक्त साबीर शेख यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे शकील खान यांनी केली होती. त्या आशयाचा फलक काँग्रेसच्या वतीने लावण्यात आला होता. मात्र एक भव्य बॅनर शिवसेनेकडून लावला होता. त्यावर ‘तिसाई देवी पूल’ असे नाव लिहिले होते.
फोटो ओळ - कल्याण येथील नवीन पत्रीपुलाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व अन्य मान्यवर.