समारोपातही भारतीय पुराणांची भलामण

By Admin | Updated: January 8, 2015 02:13 IST2015-01-08T02:13:40+5:302015-01-08T02:13:40+5:30

समारोपावेळी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी भारतीय पुराण कथांची भलामण करून या सगळ््या प्रकाराचे जाहीर समर्थन केले आहे.

Celebration of Indian mythology also | समारोपातही भारतीय पुराणांची भलामण

समारोपातही भारतीय पुराणांची भलामण

राम नाईक यांच्याकडूनही समर्थन : मुंबई विद्यापीठातील इंडियन सायन्स काँग्रेस सोहळ्याची दिमाखदार सांगता
मुंबई : पुराणात विमाने उडाल्याचा वाद सायन्स काँग्रेसमध्ये शमतो न् शमतो तोच समारोपावेळी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी भारतीय पुराण कथांची भलामण करून या सगळ््या प्रकाराचे जाहीर समर्थन केले आहे. प्राचीन भारतीय तत्त्वज्ञांनी हजारो वर्षांपूर्वी मानवी जीवनातील सर्वच अंगांना स्पर्श केला होता़ ते ज्ञान आजही भारतात असल्याचा दावाही राम नाईक यांनी केला आहे.
मुंबई विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या बुधवारी पार पडलेल्या सांगता सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, शिक्षणमंत्री विनोद तावडे, आयसीएसचे अध्यक्ष डॉ. एस. बी. निमसे, विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळुकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राचीन भारतीय संशोधकांनी विमाने तसेच शस्त्रक्रियांचा शोध लावल्याचा दावा सायन्स काँग्रेसमधील परिसंवादात करण्यात आला होता. यावरून वादळ उठले होते. विशेष म्हणजे राम नाईक यांनीही या संशोधकांची री ओढली आहे. ज्योतिषशास्त्र, गणित, अंतराळ संशोधन, वैद्यकशास्त्र, वास्तुशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आदींमध्ये भारतीयांनी पुराण काळात प्रगती केल्याचा उल्लेखही नाईक यांनी केला. तसेच या पुराणांची ज्यांना लाज वाटते, त्यांची कीव करीत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
शून्याची निर्मिती भारतात झाली. वैदिक गणिताला जगभर मान्यता मिळालेली आहे. वैद्यकीय शास्त्रातील तत्त्वे तर प्राचीन चरक संहितेचा आधार आहेत. या विज्ञान मेळाव्यात शेकडो विद्यार्थ्यांनी तयार केलेले प्रकल्प आगामी काळात देशाच्या विकासासाठी निश्चितच उपयोगी पडतील, असा ठाम विश्वास नाईक यांनी या वेळी व्यक्त केला. देशाची लोकसंख्या १२२ कोटींच्या घरात असल्याने या अफाट लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण वेळीच उपाययोजना केली नाही, तर आगामी काही दशकात आपल्याकडील गरिबी, उपासमार, कुपोषण, निरक्षरता यासारख्या समस्या आणखी भीषण होतील. या संकटांवर मात करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाची नितांत आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.
आपल्याकडे जमीन आणि पाण्याची कमतरता असून, ते कृषी क्षेत्रापुढील आव्हान आहे. यामध्येच बदलत्या हवामानाचा विपरीत परिणाम होत आहे. या बदलत्या परिस्थितीत आपल्या कृषी क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज असल्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. विज्ञानामुळे विविध क्षेत्रात अनेक समस्या निर्माण होत आहेत. नवीन आविष्कार होत असताना समस्या निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्यावी, असे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या वेळी सांगितले. भविष्यातील समस्या सोडविण्यासाठी इंडियन सायन्स काँग्रेसने १0 वर्षांचा अजेंडा तयार केला पाहिजे. या अजेंड्यापैकी कुठल्या गोष्टीची पूर्तता झाली याचाही आढावा घेतला गेला पाहिजे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)

भारतीयांकडेच
प्रथम ज्ञान -नाईक
जे आपल्याला हजारो वर्षांपासून माहीत आहे ते जगाला उशिरा ज्ञान झाले आहे. आद्य विद्वान गुरू पाणिनी, चरक, सुश्रूत, धन्वंतरी, वराह मिहीर, आर्यभट्ट हे आपले मानबिंदू असले पाहिजेत, असेही नाईक यांनी ठासून सांगितले.

टास्कफोर्स स्थापन करण्यात येईल
इंडियन सायन्स काँग्रेसकडून शासनाकडे येणाऱ्या सूचनांची पूर्तता करण्यासाठी टास्कफोर्स स्थापन करण्यात येईल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. शालेय जीवनापासूनच विद्यार्थी संशोधनाकडे कसे वळतील, यासाठी शासन प्रयत्न करेल, असेही तावडे म्हणाले.

शास्त्रज्ञांच्या शोधाचा राजकारण्यांकडून वापर !
देशातील शास्त्रज्ञांनी विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी संशोधन करून शोध लावले खरे; मात्र हे शोध म्हणजे राजकारण्यांसाठी पैसा कमविण्याचे साधन बनले आहे, असे परखड मत बीएआरसीच्या हेल्थ, सेफ्टी आणि एनव्हायर्नमेंट विभागाचे संचालक प्रा. यू. सी. मिश्रा यांनी व्यक्त केले. मुंबई विद्यापीठात आयोजित १०२ व्या इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये ‘रिसर्च नीड इन द फिल्ड आॅफ एनव्हायर्नमेंट सायन्स’ या विषयावर आयोजित परिसंवादात प्रा. यू. सी. मिश्रा बोलत होते.

ते म्हणाले की, पर्यावरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम करण्याची गरज आहे. शहरी भागांत आॅटोमोबाइल कंपन्यांचे प्रमाण अधिक आहे. या कंपन्यांमुळे हवेतील प्रदूषणात वाढ होते आहे. यावर उपाय म्हणून वेळीच पावले उचलली जाणे गरजेचे आहे. वातावरणातील बदलासह प्रदूषणामुळे जलचर आणि मनुष्य प्राण्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आहे. देशात पर्यावरणाचे रक्षण व्हावे म्हणून चांगले कायदे आहेत. परंतु या कायद्याचे पालन केले जात नाही, ही खंत आहे.

स्वच्छ भारत अभियानाच्या नावाखाली राजकारणी फोटो काढण्यासाठी हातात झाडू घेतात, परंतु पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रयत्न करण्यात येत नाही. भारताला चीनसोबत स्पर्धा करावयाची असेल तर शास्त्रज्ञांनी क्वॉलिटी आणि कॉस्टवरही काम केले पाहिजे. भारतात वाढत असणाऱ्या औद्योगिक कंपन्यांचे इंडस्ट्रीयल आॅडिट केले पाहिजे. परंतु त्यासाठी आपल्याकडे तज्ज्ञांची कमतरता असल्याचेही मिश्रा यांनी नमूद केले.

योगविज्ञान, वैदिक विज्ञानावर चर्चासत्र घ्या!
उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक केवळ भारतीय पुराणांचे कौतुक करून थांबले नाहीत, तर सायन्स काँग्रेसने योगविज्ञान आणि वैदिक विज्ञानावर चर्चासत्र आयोजित करण्याची सूचना करूनही ते
मोकळे झाले.

नॅनो टेक्नॉलॉजी विभाग देशाला अर्पण
इंडियन काँगे्रसच्या निमित्ताने जगभरातील संशोधकांनी मुंबई विद्यापीठाच्या नॅनो सायन्स टेक्नॉलॉजी विभागाला भेट देऊन तेथील तंत्रज्ञानाची माहिती करून घेतली. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी विद्यापीठाचा हा विभाग देशाला अर्पण करीत असल्याची घोषणा या वेळी कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांनी केली. यामुळे देशातील कोणताही विद्यार्थी, शिक्षक, संशोधक या विभागात येऊन संशोधन करू शकेल.

विकासासाठी उपयोग व्हावा
‘सायन्स अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी फॉर इन्क्लुसिव्ह डेव्हलपमेंट’ या विषयावरील व्याख्यानाचे अध्यक्षस्थान डॉ. अनिल काकोडकर यांनी भूषविले. काकोडकर या वेळी म्हणाले की, शिक्षण आणि उद्योगांचे संबध अधिक दृढ व्हावे आणि कृषी, आदिवासी विभागाच्या विकासासाठी विज्ञानाचा उपयोग व्हावा.

कचऱ्याची समस्या गंभीर बनत आहे. त्याची शास्त्रीयरीत्या विल्हेवाट लावण्याची कोणतीही यंत्रणा आपल्याकडे नसल्याने यावर त्वरित तोडगा काढण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने पाच वर्षांसाठी कृती कार्यक्रम हाती घेतला पाहिजे, अशी सूचना आयआयटीचे प्राध्यापक डॉ. शाम असोलकर यांनी केली.
इंडियन काँग्रेस सायन्समध्ये रिसर्च नीड इन द फिल्ड आॅफ एन्व्हायरमेंटल सायन्स या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात ते बोलत होते. देशामध्ये ३0 हजारांपेक्षा अधिक औद्योगिक कंपन्या असून, यामध्ये ९ मिलियन टन कचरा गोळा होतो, अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली. देशाने रसायनशास्त्र क्षेत्रात प्रगती केली आहे. मात्र आरोग्याला अपायकारक असलेले ई-वेस्ट कसे नष्ट करावे, यासाठी आपल्याकडे यंत्रणेचा अभाव आहे. ई -कचऱ्याच्या वाढत्या समस्येमुळे मानवी आरोग्यावर परिणाम होत असून याबाबत जनजागृती तसेच ज्ञानाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
ई-कचऱ्याबाबत आपल्याकडे
कमी संशोधन होत असल्याबद्दलही त्यांनी खंत व्यक्त केली. आयआयटीमध्येही विविध क्षेत्रांत संशोधन सुरू आहे. मात्र ई -कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची याचे उत्तर आयआयटीकडेही
नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

Web Title: Celebration of Indian mythology also

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.