Join us
Daily Top 2Weekly Top 5

फोन आणि ईमेलवर मिळणार करिअर मार्गदर्शन; शिक्षण विभागाचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 02:12 IST

विद्यार्थ्यांसाठी लाभदायक; ७१ समुपदेशक, मार्गदर्शकांची नियुक्ती

मुंबई : नुकताच शालेय शिक्षण विभागाकडून कलचाचणी व अभिक्षमता चाचणीचा निकाल जाहीर करण्यात आला. मात्र सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांना करिअर निवडीसंबंधी योग्य मार्गदर्शन व समुपदेशनाची निकड जाणवत आहे. अशा परिस्थितीत पुण्याच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्यामार्फत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात समुपदेशक व मार्गदर्शकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि मुंबई जिल्ह्यासाठी तब्ब्ल ७१ समुपदेशक आणि मार्गदर्शकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दहावीच्या परीक्षेसंदर्भात शालेय शिक्षण विभागाने भूगोलाचा पेपर रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी आता केवळ निकालाची वाट पाहत आहेत. मात्र त्याआधी कोणत्या शाखेला जायचे हे ठरविण्यासाठी आपली आवड कशात आहे? आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, याबद्दल शिक्षक, मार्गदर्शक यांच्याकडून योग्य ते मार्गदर्शन घेत असतात. अनेक विद्यार्थी तर यासाठी बाहेरून काही अ‍ॅप्टिट्यूड परीक्षाही देतात आणि मगच आपल्याला कोणती शाखा निवडायची आहे यासंबंधी निर्णय घेत असतात. मात्र यंदा राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, शैक्षणिक संस्था बंद असल्याने विद्यार्थ्यांना योग्य समुपदेशन मिळणे अवघड झाले आहे. सद्यपरिस्थितीत आॅनलाइन शिक्षण सुरू असताना विद्यार्थ्यांना आॅनलाइन समुपदेशन आणि मार्गदर्शनही मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी या समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समुपदेशकांचे संपर्क क्रमांक आणि ईमेल आयडी विद्यार्थ्यांना देण्यात आले असून विद्यार्थी व्हॉट्सअप, मेल किंवा फोनवरून सल्ला आणि मार्गदर्शन घेऊ शकणार आहेत.भूगोलाच्या गुणांसंबंधी अद्याप अनिश्चिती : दहावीच्या विद्यार्थ्यांचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून भूगोलाच्या पेपरचे गुण नेमके कसे आणि किती द्यायचे यावर निश्चिती होणार आहे. मात्र अद्याप मंडळाकडून त्यासंदर्भात कोणतीही अद्ययावत माहिती मिळालेली नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक चिंतेत आहेत. मंडळाकडून गुणपद्धती निश्चित झाल्यानंतरच निकालाचा अंदाज तरी विद्यार्थ्यांना येऊ शकणार आहे. मात्र सध्या त्याबाबतीत कोणतीच माहिती मंडळाकडून मिळत नसल्याने विद्यार्थी, पालक गुणपद्धती लवकर जाहीर करण्याची मागणी करत आहेत.

टॅग्स :करिअर मार्गदर्शन