डोळ्यांचे आरोग्य सांभाळा
By Admin | Updated: June 8, 2015 03:48 IST2015-06-08T03:48:59+5:302015-06-08T03:48:59+5:30
साथीच्या आजारांबरोबरच डोळ्यांचा त्रास पावसाळ्यात वाढत असल्याने ‘मुंबईकरांनो, डोळ्याची काळजी घ्या, डोळे स्वच्छ ठेवा,’ असा सल्ला डॉक्टर देत आहेत.

डोळ्यांचे आरोग्य सांभाळा
मुंबई : रविवारी संध्याकाळनंतर पावसामुळे मुंबई थंडावली आहे. उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना गारवा मिळाला. पण पावसामुळे सुखावलेल्या मुंबईकरांनी आता त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. साथीच्या आजारांबरोबरच डोळ्यांचा त्रास पावसाळ्यात वाढत असल्याने ‘मुंबईकरांनो, डोळ्याची काळजी घ्या, डोळे स्वच्छ ठेवा,’ असा सल्ला डॉक्टर देत आहेत.
केईएम रुग्णालयाच्या नेत्रचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. अर्जुन अहुजा यांनी सांगितले, की पावसात भिजायला जाताना डोळ््यांची विशेष काळजी घ्या. अनेकदा पावसात भिजल्यावर डोळे लाल होतात.
याचे कारण पावसाचे पाणी स्वच्छच असते असे नाही. या पाण्याबरोबर इतर काही गोष्टी अथवा दूषित पाणी डोळ््यात जाते. यामुळे डोळे चुरचुरतात. हे टाळण्यासाठी पावसात भिजताना डोळे बंद ठेवा.
पावसाळ्यात डोळ्याला फंगसचा त्रास होऊ शकतो. डोळ्यात पिवळ्या रंगाचा ठिपका येणे, डोळा दुखणे ही फंगसची लक्षणे आहेत. यावर तत्काळ उपचार न झाल्यास दृष्टी कमी होण्याचा धोका असतो. डोळ्याला संसर्ग झाल्यास फॅमिली डॉक्टर अथवा औषधांच्या दुकानातून आय ड्रॉप घेतले जातात. पावसाळ्यात डोळ्याला कोणताही त्रास उद्भवल्यास तत्काळ नेत्रचिकित्सकाकडे जाऊन तपासणी करून घेणे आवश्यक आहे. संसर्ग डोळ्यांत पसरल्यास गुंतागुंत वाढू शकते, असे डॉ. अहुजा यांनी सांगितले.
अनेकदा पावसाळ्यात डोळ्यातून सतत पाणी येते. यामुळे डोळे कोरडे पडून जळजळ होते. अशावेळी नेत्रचिकित्सकाच्या सल्ल्याने डोळ्यात औषध घालावे. काही वेळा डोळ्याच्या बाहुलीला संसर्ग होतो. अशाप्रकारच्या संसर्गामुळे डोळ्यांना वेदना होणे, दृष्टी धूसर होणे, डोळ्यातून पू येणे असा त्रास जाणवतो. डोळ्याचा त्रास टाळण्यासाठी स्वच्छ पाण्याने डोळे धुवा. हात स्वच्छ ठेवा. डोळ्यांसाठी वेगळा रुमाल वापरा, असा सल्ला नेत्रचिकित्सक डॉ. रिद्धी शाह यांनी दिला. (प्रतिनिधी)
मुलांना शिकवा
> उन्हाळा संपून पावसाळा सुरू होण्याच्या या कालावधीत वातावरणातील बदलांमुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाणात वाढ होते. हवेतील विषाणू, जीवाणूंमुळे डोळे येतात.
> लहान मुले एकत्र खेळत असतात, शाळेत जातात यामुळे त्यांना संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो.
> मुलांना संसर्ग टाळण्यासाठी हात स्वच्छ धुवा, दुसऱ्याचा रुमाल वापरू नका, स्वत:चा रुमाल इथे - तिथे टाकू नका, संसर्ग झालेल्या मुलांजवळ जाऊ नका, असे सांगितले पाहिजे.